

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव शहर हे बांगलादेशी घुसखोरीचे आश्रयस्थान असून, बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले मिळवणारे लोक देशाच्या सुरक्षेला धोका ठरत आहेत. असे लोक भारतीय नागरिक नसून ते बांगलादेशी, रोहिंग्या, पाकिस्तानी अथवा अफगाणी असू शकतात आणि अशा फसवणुकीमुळे शहर अतिरेक्यांचे केंद्र बनत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला.
बनावट जन्मदाखले प्रकरणाच्या अनुषंगाने भाजप नेते सोमय्या मंगळवारी (दि. २४) शहरात दाखल झाले. या दौड्यात त्यांनी अपर व अपर पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
अपर पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सोमय्या यांनी सांगितले की, बनावट कागदपत्रांच्या आधारे देण्यात आलेले ४४०० जन्मदाखले रद्द करण्यात आले असून, त्यापैकी १०८३ प्रकरणांत गुन्हे दाखल आहेत. रद्द करण्यात आलेल्या दाखल्यांपैकी ३३०० दाखले जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत, तर १०४४ दाखले महापालिकेमार्फत देण्यात आले होते.
जन्मदाखल्यांसाठी आवश्यक असलेले कागदपत्रे अपूर्ण अथवा संशयास्पद असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतामध्ये जन्म झाल्याचा कोणताही ठोस पुरावा नसताना जन्मदाखले देण्याचा अधिकार कुणालाही नसल्याचे सांगत, संबंधित लाभार्थ्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात येणार असल्याचेही सोमय्या यांनी नमूद केले.
अशा प्रकारे बनावट कागदपत्रांद्वारे नागरिकत्वाचा लाभ फसवणूक देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी गंभीर बाब असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. या दौऱ्यात सोमय्या यांनी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण तसेच अपर पोलिस अधीक्षक तेगवीर सिंह संधू यांची भेट घेतली. मात्र, तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी यावेळी महापालिकेत जाणे टाळले. याआधी बनावट जन्मदाखला प्रकरणी मालेगाव भेटीदरम्यान ते महापालिकेत जाऊन प्रशासक व आयुक्तांची भेट घेत असत.
सत्ताधाऱ्यांकडून सोमय्यांचा निषेध, महापालिकेबाहेर आंदोलन
सोमय्या यांच्या दौऱ्याला शहरातील महापालिकेतील सत्ताधारी गटाकडून तीव्र विरोध झाला. महापौर नसरिन शेख व उपमहापौर शान-ए-हिंद यांनी सोमय्या यांच्या उपस्थितीचा निषेध नोंदवला. महापालिकेची महासभा व महापौरांची परवानगी नसताना कोणतीही माहिती पुरवू नये, असा कायदेशीर अधिकार असल्याचे नमूद करत महापौरांनी दोन दिवसांपूर्वीच आयुक्त रवींद्र जाधव यांना नोटीस बजावली होती.
यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले होते. सोमय्या यांच्याकडे कोणतेही घटनात्मक पद नसताना ते प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका कशा घेऊ शकतात, असा सवाल इस्लाम पक्षाचे संस्थापक आसिफ शेख यांच्यासह महापौर व उपमहापौरांनी उपस्थित केला. तसेच सोमय्या यांनी मालेगावची प्रतिमा बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरीचे शहर म्हणून बदनाम केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला.
अल्पसंख्याक समाजाला विनाकारण लक्ष्य केल्याचे म्हटले. यावेळी महापौर, उपमहापौर, सत्तापक्षातील सर्व नगरसेवकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर तिरंगा हाती घेऊन ठिय्या आंदोलन केले. 'सोमय्या गो बँक'च्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलकांनी आयुक्तांच्या वाहनासमोर बसून त्यांना बैठकीसाठी जाण्यापासून रोखले.