Jintendra Awad | आव्हाडांकडून भुजबळांचे आभार, म्हणाले मी तुमचा कायम ऋणी राहील

Jintendra Awad | आव्हाडांकडून भुजबळांचे आभार, म्हणाले मी तुमचा कायम ऋणी राहील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शालेय अभ्यासक्रमात 'मनुस्मृती'मधील दोन श्लोकांचा समावेश करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात महाड येथे आंदोलन करताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याने भाजप, शिवसेना शिंदे गटाकडून आव्हाडांविरोधात राज्यभर आंदोलन केले जात असताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र आव्हाड यांची पाठराखण केली आहे. इतकेच नव्हे तर शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील श्लोकांचा समावेश करू पाहणाऱ्या शिक्षण विभाग आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची कानटोचणी करत भुजबळ यांनी महायुतीलाही घरचा आहेर दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

  • महाड येथे मनस्मृती विरोधात आंदोलन करताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना झाली. 
  • त्यानंतर भाजप, शिवसेना शिंदे गटाकडून आव्हाडांविरोधात राज्यभर आंदोलन केले जात आहे. 
  • या मुद्द्यावर भुजबळांनी मात्र आव्हांडाची पाठराखण केल्याने जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळांचे आभार मानले आहेत.

भुजबळ आव्हाडांच्या बाजुने काय म्हणाले?

भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना आव्हाड यांची बाजू मांडली आहे. भुजबळ म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे खूप चांगल्या भावनेने तिथे गेले होते. तिथे त्यांच्या हातून चुकून काहीतरी झाले. तो कागद फाडताना त्यांनी त्यावर कोणाचा फोटो आहे ते पाहिले नव्हते. त्या प्रकरणी त्यांनी जाहीर माफीदेखील मागितली आहे. त्यामुळे आव्हाडांवर टीका करत बसण्यापेक्षा आपण त्यांची भावना लक्षात घेतली पाहिजे. ते विरोधी पक्षातील नेते असले तरी त्यांच्यावर टीका करण्यात अर्थ नाही. मूळ मुद्द्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आमचे म्हणणे इतकेच आहे की, आपल्या शालेय शिक्षणात मनुस्मृतीचा चंचूप्रवेश नको. मनुस्मृतीचे श्लोक शालेय शिक्षणात अचानक आणण्याची गरज आहे? त्यातील दोन श्लोक चांगले आहेत म्हणतात, पण चंचूप्रवेश पाहिजे कशाला? ज्ञानेश्वरांचे, संत तुकारामाचे, अनेक संतांचे श्लोक आहेत. त्यामुळे मनुस्मृतीतील श्लोकांचा चंचूप्रवेश का करायचा? याच्या मागे काय चाललेय हे शोधले पाहिजे, असे नमूद करत बहुजन समाजातील दीपक केसरकर त्याची भलामण करतात हे अतिशय दु:खदायक वाटते, अशा शब्दांत भुजबळांनी महायुतीवरही टीका केली आहे.

आव्हाडांनी मानले भुजबळांचे आभार

भुजबळांनी पाठराखण केल्यानंतर आव्हाड यांनी एक्सपोटद्वारे त्यांचे आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, भुजबळ साहेब, अनावधानाने काल माझ्याकडून चूक झाली आणि त्या चुकीबद्दल मी कालच जाहीरपणे नतमस्तक होऊन माफी मागितली. आज आपण त्याचा उल्लेख करीत मनुस्मृतीला विरोध केलाच पाहिजे, हा विचार पुढे आणला. मी आपला मनापासून आभारी आहे. मला काल चवदार तळ्यावर, आपल्या मागे इतर पक्षातील कोण उभे राहतील, असा प्रश्न विचारला असता, मी पटकन एकच नाव घेतले, मा. छगन भुजबळसाहेब! आपल्या मनात बहुजन समाजाविषयी असलेले प्रेम अन् आपली भूमिका मला माहीत आहे. त्यामुळेच मी इतक्या अधिकाराने आपले नाव घेतले. आपण ज्या पद्धतीने माझ्या मागे उभे राहिलात त्याबद्दल मी आपला कायम ऋणी राहीन. मनुस्मृतीविरोधातील आपली लढाई आपण सगळे एकत्रित लढू, हीच आपली सर्वांची भूमिका असली पाहिजे."

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news