

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसानंतर आता पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. गुरुवारी (दि.९) दिवसभर बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहिले, तर सटाणा, कळवण आणि पेठ तालुक्यांत अधूनमधून रिमझिम सरी कोसळल्या. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण तब्बल ७० टक्के भरल्याने नाशिककरांची पाणीटंचाईची चिंता दूर झाली आहे.
जूनअखेरपासून आणि जुलैच्या सुरुवातीला झालेल्या संततधारेमुळे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. परिणामी, जलसाठ्यात वाढ होत असून, शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाल्याचे चित्र आहे. यामुळे आगामी काही महिन्यांसाठी पाणीपुरवठाबाबत प्रशासनालाही दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील इतर धरणांमधील पाणीसाठ्यातही समाधानकारक वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण असून, खरीप पिकांना या पावसाचा चांगला लाभ झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी सुरू राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
धरणसाठा (टक्के)
गंगापूर : ७०.१८
कश्यपी : ४८.३३
गौतमी गोदावरी : ८२.७१
आळंदी : २३.७७
पालखेड : ५१.९१
करंजवण : २७.४८
वाघाड : १९.६४
ओझरखेड : ३४.२३
पुणेगाव : ४६.२३
तीसगाव : १४.७३
दारणा : ५२.०८
भावली : ८७.५२
मुकणे : ३४.६२
वालदेवी : ७०.८७
गिरणा : ३५.२९
चणकापूर : ४९.५७