

जळगाव : जळगाव जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत २४९.५६ दलघमी पाण्याची आवक झाली असून, धरणाच्या विविध पाणलोट क्षेत्रांमध्ये एकूण १,६६४ मिलिमीटर (एकत्रित) पावसाची नोंद झाली आहे.
धरणातील वाढती पाण्याची आवक लक्षात घेऊन हतनूर धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यात पाऊस सुरू असला तरी हतनूर धरणातील पाणीसाठा मुख्यतः मध्य प्रदेशातील पाणलोट क्षेत्रातील पावसावर अवलंबून असतो.
बऱ्हाणपूर, देडतलाई, एरंडी, गोपालखेडा, चिखलदरा, लोहारा आणि अकोला या पाणलोट क्षेत्रांमध्ये पाऊस झाल्यानंतर तापी नदीमार्गे हतनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होते. त्यामुळे या भागातील पावसाचा धरणाच्या जलसाठ्यावर थेट परिणाम होत असतो.
बऱ्हाणपूर : २५.४, देडतलाई: ७५.४, टेक्सा: ०.६, एरंडी: ७१.८, गोपालखेडा: ०.८, लोहारा: १२.६ आणि अकोला: ३ मिमी. या सर्व क्षेत्रांत मिळून एकूण १९८.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
सद्य जलपातळी: २११.५६० मीटर (पूर्ण जलाशय पातळी: २१४.००० मीटर)
एकूण जलसाठा: २६०.०० दशलक्ष घनमीटर (६७.०१%)
उपयुक्त साठा: १२७.०० दशलक्ष घनमीटर (४९.८०%)
दरवाजांमधून (रेडियल गेट) विसर्ग: ३१३.०० क्युमेक्स (११,०५४ क्युसेक)
दरवाजे उघडण्याची स्थिती: ४ दरवाजे १.० मीटरने आणि २ दरवाजे ०.५ मीटरने उघडे.
कालवा विसर्ग: ८.५० क्युमेक्स (३०० क्युसेक) | आर.एस. गेट विसर्ग: शून्य
आजचा पाऊस (धरण क्षेत्र): २३ मिमी | एकूण पाऊस: १०७ मिमी
पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे आगामी काही दिवसांतही हतनूर धरणातील पाण्याची आवक कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापी नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.