

निफाड : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला होता. मात्र, हा इशारा धुडकावून नांदूरमधमेश्वर धरणाच्या खालच्या बाजूला मासेमारीसाठी गेलेले १४ तरुण पुरात अडकले होते. पाण्याचा वेढा झपाट्याने वाढल्याने या तरुणांना बाहेर पडता आले नाही.
चोहोबाजूंनी वेगाने वाहणारे पाणी पाहून तरुणांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. घटनेची माहिती मिळताच निफाड पोलिस, महसूल विभाग आणि स्थानिक जीवरक्षक तरुणांनी धाव घेतली. पाण्याचा प्रवाह प्रचंड असतानाही सुरक्षा साधनांच्या सहाय्याने तीन तास रेस्क्यू ऑपरेशन ऑपरेशन राबवण्यात आले.
सायंकाळी ५.३० च्या सुमारास या १४ जणांची सुखरूप सुटका करण्यात प्रशासनाला यश आले. सर्व तरुण सुरक्षित बाहेर आल्याचे पाहताच त्यांच्या नातेवाइकांनी समाधान व्यक्त केले. पावसाळ्यात नागरिकांनी अशा प्रकारे नदीपात्रात उतरून जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अडकलेल्यांत यांचा होता समावेश
शुभम माळी, समाधान माळी, रोशन माळी, मंगेश गायकवाड, अंकुश पिंपळे, लखन बर्डे, अजय पवार, दीपक पवार, रवींद्र बर्डे, शुभम बर्डे, नवनाथ आंबेकर, महेश मोरे, महेंद्र पवार आणि अजय सोनवणे.
नांदूरमधमेश्वरमधून ५५ हजार ९२८ क्यूसेक विसर्ग
नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून बुधवारी (दि.८) सायं. ४ च्या सुमारास ८ वक्राकार दरवाजातून गोदावरी नदीपात्रात ५५ हजार ९२८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच नदीपात्रातील साहित्य व जनावरे तत्काळ सुरक्षितस्थळी हलवावीत, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे.