

वणी : अखंड हरिनामाच्या गजरात, टाळ-चिपळ्या आणि मृदंगाच्या निनादात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या अभंगांचे मंगलस्वर घुमवत शेकडो वारकऱ्यांनी गुरुवारी (दि. ९) श्रीक्षेत्र वणी येथून श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने भक्तिभावाने प्रस्थान केले. त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पौषवारीमध्ये सलग तीन वर्षे 'आदर्श व निर्मल दिंडी' म्हणून प्रथम क्रमांकाचा मान पटकावलेल्या या दिंडीने आता त्या अनुभवाच्या बळावर प्रथमच श्रीक्षेत्र सप्तशृंगगड-वणी परिसरातून आषाढी वारीसाठी पायी दिंडीचे आयोजन केले आहे.
संगमनेर (ता. दिंडोरी) येथील युवा कीर्तनकार योगेश महाराज जाधव यांच्या नेतृत्वाखाली श्रीक्षेत्र सप्तश्रृंगगड-वणी, धोडप किल्ला परिसर ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा हा ऐतिहासिक दिंडी सोहळा आयोजित केला आहे. प्रस्थान वणी येथील श्री खंडेराव महाराज पटांगणातून झाले. या प्रसंगी खासदार भास्कर भगरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, उपसरपंच विलास कड, आबासाहेब देशमुख, गंगाधर निखाडे, सहायक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्यासह ज्येष्ठ वारकरी उपस्थित होते.
विलास भवर यांनी स्वागत केले. दिंडी प्रस्थानावेळी छत्रपती संभाजी महाराज चौकात ग्रामस्थांकडून तीन जेसीबीच्या सहाय्याने दिंडीत सहभागी वारकरी, अश्व, बैलगाड्या आणि रथावर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात दिंडी श्री जगदंबा मातेच्या मंदिरात पोहोचली.
तेथे देवीचे दर्शन घेऊन वारकऱ्यांनी पंढरीच्या दिशेने पुढील प्रवासास सुरुवात केली. ९ जुलै रोजी वणी येथून निघालेली ही दिंडी विविध गावांमधून प्रवास करत २५ जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दाखल होणार आहे. १७ दिवसांच्या या पायी वारीत सेवा, स्वच्छता आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेशही समाजापर्यंत पोहोचविला जाणार आहे.