Farmer Death | कांद्यासाठी धाव; काळानेच गाठले !

Farmer Death | वादळी वाऱ्यात झाड कोसळून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
accident
accidentfile photo
Published on
Updated on

जायखेडा : प्रतिनिधी

शेतकरी जगतो तो आपल्या पिकासाठी आणि अनेकदा मरतोही त्याच पिकासाठी याची प्रचिती देणारी अत्यंत हृदयद्रावक घटना बिजोटे परिसरात घडली आहे. अवकाळी पावसाच्या भीतीने शेतात काढून ठेवलेले कांदा पीक वाचवण्यासाठी जीवाची घाई करत गावाकडे निघालेल्या शेतकरी बापू सखाराम जाधव यांचा वादळी वाऱ्यात झाड अंगावर कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला.

accident
Onion Price Drop Nashik | कांद्याला 50 पैसे किलो दर! सटाणा बाजार समितीत शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; संताप अनावर

या घटनेने संपूर्ण परिसर सुत्र झाला असून, गावागावांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. बिजोटे येथील वापू सखाराम जाधव हे आपल्या पुतण्याच्या विवाह समारंभासाठी नामपूर येथे गेले होते. घरात आनंदाचे वातावरण असतानाच अचानक आकाशात काळे ढग दाटून आले. वादळी वाऱ्यासह पावसाची चिन्हे दिसू लागल्याने त्यांच्या मनात शेतातील कांदा पिकाची चिंता घर करू लागली.

अनेक महिन्यांच्या कष्टाने उभे केलेले आणि नुकतेच काढून शेतात घोडी करून ठेवलेले कांदे पावसात भिजले तर संपूर्ण मेहनत वाया जाईल, या विचाराने ते अस्वस्थ झाले. शेवटी विवाहसोहळा अर्धवट सोडून ते तातडीने आपल्या गावाकडे निघाले. गुरुवारी (दि. ७) दुपारच्या सुमारास आखतवाडे रस्त्याने ते शेताच्या दिशेने जात असताना अचानक वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला.

धुळीचे लोट, ढगांचा गडगडाट आणि जोरदार वाऱ्यामुळे परिसर भयावह झाला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयासमोरील एका लिंबाच्या झाडाचा आसरा घेतला. मात्र, नियतीने त्यांच्यासाठी वेगळाच डाव आखला होता. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, काही क्षणांतच ते मोठे लिंबाचे झाड मुळासकट उन्मळून थेट त्यांच्या अंगावर कोसळले.

अचानक घडलेल्या या भीषण घटनेत बापू जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. काही क्षणांपूर्वी आपल्या पिकाची काळजी करत धावणारा कष्टकरी शेतकरी क्षणार्धात काळाच्या पडद्याआड गेला. घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरताच बिजोटे, आखतवाडे व आसपासच्या गावांमध्ये शोककळा पसरली.

accident
Nashik Tree Census 2026 | नाशिकच्या निसर्गसंपदेत वाढ! शहरातील वृक्षांची संख्या 50 लाखांच्या पार; मनपाची नवी गणना अंतिम टप्प्यात

गावकरी घटनास्थळी धावले तेव्हा अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते. ज्याने आयुष्यभर मातीशी नातं जपलं, त्यालाच आज निसर्गान हिरावून नेलं, अशा शब्दांत ग्रामस्थांनी भावना व्यक्त केल्या. सध्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कांदा उत्पादक शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत असताना, तोंडाशी आलेले पीक वाचवण्यासाठी दिवस-रात्र झटत आहेत.

अशा परिस्थितीत एका शेतकऱ्याचा पिकाच्या काळजीपोटी जीव जाणे ही संपूर्ण समाजमन हेलावून टाकणारी घटना ठरत आहे. बापू जाधव यांच्या पश्चात कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निसर्गाच्या या निर्दयी तडाख्याने पुन्हा एकदा शेतकऱ्याचे असुरक्षित आयुष्य समोर आले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news