

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महायुतीसमोरील बंडखोरीचे संकट अद्याप कायम असून, अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांना माघारीसाठी राजी करण्याचे प्रयत्न अद्याप निष्फळ ठरत आहेत. महायुती सरकारमधील तीन मंत्र्यांच्या मध्यस्थीनंतरही गिते निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने आता शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे आणि आ. किशोर दराडे यांनी स्वतः मैदानात उतरून संपर्क मोहीम सुरू केली मंगळवारी (दि. ९) शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, तर दुसरीकडे नाशिकमध्ये आ. किशोर दराडे यांनी भाजपचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली.
दोघांमध्ये सुमारे तासाभराहून अधिक काळ बंद दाराआड खलबते झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. मात्र, बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोर दराडे यांनी या भेटीला राजकीय रंग देण्याचे कारण नसल्याचे सांगितले. दीपाली गिते या आमच्या मतदार आहेत. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या प्रचारासाठी आलो होतो. त्यांनी युतीचा धर्म पाळत महायुतीसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे, असे दराडे म्हणाले. यावेळी किशोर दराडे यांनी गोकुळ गिते यांच्याशीही संवाद साधणार असल्याचे स्पष्ट केले.
'संकटमोचक 'च संकटात ?
गिते बंधू मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत, त्यामुळे महाजन यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. एकीकडे गिते माघार घेत नाहीत दुसरीकडे गितेंच्या उमेदवारीवरून महाजन यांच्याकडे संशयाची सूई जात आहे. महाजन यांच्या सांगण्यावरूनच गितेंनी अर्ज भरला होता का, अशी शंका महायुतीच्या गोटात उपस्थित होत आहे. त्यामुळे, कालपर्यंत बडखोरांच्या माधारीसाठी शिवसेना भाजपचे नेते एकत्र प्रयत्न करत होते. मात्र, आता थेट शिवसेनेचे नेते नाराजी व्यक्त करीत आहेत.
...तर जाहीर माफी मागेन !'
अलीकडे चर्चेत आलेल्या कथित ऑडिओ क्लिपबाबत विचारले असता किशोर दराडे म्हणाले की, राजकारणात विरोधकांकडून गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न होत असतात. तपासात तो आवाज माझा किंवा आमच्या कुटुंबातील कोणाचा असल्याचे सिद्ध झाले, तर मी जाहीरपणे माफी मागण्यास तयार आहे.
मंत्र्यांचे प्रयत्न अपयशी
महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाला देण्यात आल्यानंतर नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारीला पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रसाद हिरे यांनी माघार घेतली असली, तरी गोकुळ गिते यांची उमेदवारी कायम आहे. त्यांना माघारीसाठी राजी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांनी स्वतंत्रपणे प्रयत्न केले. मात्र, त्यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. गोकुळ गिते निवडणूक रिंगणात कायम राहिल्यास महायुतीच्या उमेदवारासमोर आव्हान निर्माण होऊ शकते.