

इगतपुरी:
Bhavli Waterfall Controversy: सहलीचा आनंद घेण्यासाठी भावली धबधब्यावर गेलेल्या एका कुटुंबाला स्थानिक गुंडांच्या अरेरावीचा आणि त्यानंतर जीवघेण्या हल्ल्याचा सामना करावा लागला. या घटनेत पीडित कुटुंबाला तब्बल ३० किलोमीटरपर्यंत जीव वाचवण्यासाठी पाठलाग सहन करावा लागला. या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, नाशिक ग्रामीण पोलिसांनी ९ आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. या सर्वांवर मकोका लावण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूनम भागवत आणि त्यांचे कुटुंब १२ तारखेला भावली धबधब्यावर गेले होते. तिथे असताना काही स्थानिक तरुणांनी महिला पर्यटकांची छेड काढली आणि अश्लील शेरेबाजी केली. पती किरण भागवत यांनी याला विरोध केल्यावर वाद वाढला. स्थानिक तरुणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. ग्रामस्थांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर काही लोकांनी धमकावण्यास सुरुवात केली.
कुटुंब तिथून कारने बाहेर पडले असता, हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. बलेनो कार आणि दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी लोखंडी रॉड आणि दगडांच्या साहाय्याने कारवर वार केले. गाडीच्या सर्व काचा फोडून हल्लेखोरांनी हा थरार सुरू ठेवला. यावेळी गाडीत लहान मुलेही होती. घोटी टोलनाक्यावरही त्यांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र भागवत कुटुंबाने टोल गेट तोडून कसातरी आपला जीव वाचवला.
किरण भागवत यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी अंबड पोलीस स्टेशन गाठल्यानंतरच त्यांना सुरक्षा मिळाली. या हल्लेखोरांनी "केस दाखल करू नका" असे म्हणत दहा लाखांची ऑफर दिली होती, असाही धक्कादायक आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. "आम्ही जर तिथेच थांबलो असतो, तर कदाचित आमच्यापैकी कुणीतरी जिवंत राहिलं नसतं," असे सांगत त्यांनी या घटनेचे गांभीर्य अधोरेखित केले.
सध्या इगतपुरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पंचनामा पूर्ण झाला आहे. मात्र, भावली डॅम परिसरात पर्यटकांची सुरक्षा धोक्यात असून स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांचा उपद्रव वाढल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.