

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकसित राज्य मार्ग क्र. ३७ विकसित केला आहे. तथापि, चिंचोली, वडगाव पिंगळा व पांढुर्लीतील शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदल्याच्या मागणीसाठी ५३ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे.
या आंदोलनाला शनिवारी (दि.१४) प्रहारचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने नाराजी व्यक्त केली. दोन दिवसांत प्रश्न मार्गी न लावल्यास बांधकाम विभागासमोर आंदोलनाचा इशारा दिला. चिंचोली, वडगाव पिंगळा व पांढुर्लीतील शेतकरी राज्य मार्ग क्र. ३७भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी उपोषणास बसले आहेत.
मोबदल्यासंदर्भात अंतर्गत पत्रव्यवहार करूनही शासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. यावेळी कडू यांनी बांधकामचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे यांच्याशी संपर्क करत जाब विचारला. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले.
प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील जबाबदारी शासनाची राहील, असे कडू यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद शिंदे, भास्कर उगले, भाऊराव झाडे, कचरू गंधास, भाऊसाहेब हराळे,
संपत विंचू, शरद सानप, अंबादास झाडे, राजेंद्र झाडे, धोंडीराम झाडे, समाधान झाडे, विजय झाडे, संपत सांगळे, शांताराम कुटे, रवींद्र झाडे, विठ्ठल सानप, ज्ञानेश्वर पगारे, योगेश हराळे उपस्थित होते.
मंत्रालयावर ट्रॅक्टरवर बिहऱ्हाड मोर्चा
शिवजन्मोत्सवानंतर कधीही नाशिकहून मुंबईकडे ट्रॅक्टरवर बिऱ्हाड मोर्चा काढण्याचा निर्णय बाधित शेतकऱ्यांनी घेतला. कुटुंबीयांसह मंत्रालयावर धडक दिली जाणार आहे. शासनाने दखल न घेतल्यास हा मोर्चा निर्णायक ठरेल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
प्रकल्पबाधित एकत्र लढा उभारणार
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक घोटी, नाशिक - त्र्यंबकेश्वर, वाढवण बंदर रस्ता, रिंग रोडसह विविध रस्ते व प्रकल्पांची कामे हाती घेण्यात येत आहेत. तथापि, या प्रकल्पांमुळे बाधित शेतकरी चिंचोली येथे एकत्र आले होते. सर्व बाधितांनी आंदोलनास पाठिंबा दर्शवत एकसंघ लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.