

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या भोंद अशोक खरात प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस अधिक खोलात जात असून, या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट उच्चस्तरीय शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
विशेषतः एका महिला आयएएस अधिकाऱ्यांशी संबंधित कनेक्शन उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात असून, संबंधित अधिकारी लवकरच पोलिस चौकशीच्या फेऱ्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
या घडामोडींमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, तपास यंत्रणांच्या हाती संबंधित महिला अधिकाऱ्यांचे आणि भोंदू अशोक खरात यांच्यातील चॅटिंग, ऑडिओ कॉल्स, मेसेजेस तसेच आर्थिक व्यवहारांचे तपशील लागले आहेत. या सर्व माहितीचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत असून, त्यातून दोघांमधील संबंधांचे स्वरूप आणि त्याची व्याप्ती उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष तपास पथक या प्रकरणात अत्यंत गोपनीय पद्धतीने काम करत असून, प्रत्येक बाब बारकाईने तपासली जात आहे.
दरम्यान, संबंधित महिला अधिकाऱ्यांनी आपल्या पसंतीच्या पोस्टिंगसाठी खरातच्या माध्यमातून लॉबिंग केल्याची चर्चा यापूर्वीपासून प्रशासनात रंगत होती. विशेषतः नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाची 'क्रीम पोस्टिंग' मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे बोलले जात होते.
मात्र, विविध तक्रारी आणि अंतर्गत विरोधामुळे ही पोस्टिंग मिळू शकली नाही, अशीही माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील कनेक्शन अधिक गंभीर मानले जात आहे. तपासादरम्यान सिन्नर तालुक्यातील पास्ते येथील व्यवहारांमध्येही संशयास्पद बाबी समोर आल्या आहेत.
संबंधित महिला अधिकाऱ्यांच्या जवळच्या व्यक्ती, फॅमिली फ्रेंड तसेच एका एनजीओच्या माध्यमातून काही मौल्यवान जमिनी खरेदी करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.
या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या व्यवहारांची कागदपत्रे तपास यंत्रणांकडून तपासली जात आहेत. या सर्व व्यवहारांमध्ये खरातच्या नेटवर्कचा सहभाग असल्याची चर्चा असून, त्यातून आणखी मोठे आर्थिक जाळे उघड होण्याची शक्यता आहे.
प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
संबंधित महिला अधिकारी या खरातच्या शिवनिका संस्थान अंतर्गत येणाऱ्या ईशान्येश्वर मंदिरात वारंवार भेट देत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. या भेटींचा उद्देश काय होता, तसेच या माध्यमातून कोणते व्यवहार किंवा संपर्क प्रस्थापित झाले, याचा सखोल तपास सुरू आहे.
एकूणच, या प्रकरणामुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही संशयाची छाया निर्माण झाली आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या प्रकरणात आणखी मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, संपूर्ण राज्याचे लक्ष आता या तपासाकडे लागले आहे.