

नाशिक : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केलेले कौतुक आणि भाजप प्रवेशाच्या संदर्भातील एका विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र, खा. डॉ. अमोल कोल्हे आणि खा. भास्कर भगरे यांनी 'आम्ही सर्व आठही खासदार एकसंध आणि शरद पवार साहेबांच्या सोबत आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला'.
नाशिक येथे गुरुवारी (दि. २) खा. डॉ. कोल्हे आणि खासदार भगरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. डॉ. कोल्हे म्हणाले की, पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या ओरिजनल अलाइनमेंटबाबत बोलताना एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला होता की, 'तुम्ही भाजपमध्ये गेल्याशिवाय ही रेल्वे होणार नाही का?' त्यावर मी प्रतिप्रश्न केला होता की, 'अशी काही ऑफर आहे का? आणि रेल्वेच्या संदर्भात तशी काही ऑफर आली तर विचार करू. हे विधान केवळ रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात होते, परंतु काही जणांनी त्याचा चुकीचा अर्थ काढण्याचा प्रयत्न केला'.
फडणवीस यांना 'इन्फ्रामॅन' म्हणण्याबाबत आणि पक्षांतराच्या अफवांवर खा. कोल्हे यांनी स्पष्ट केले की, महाविकास आघाडीचे सर्व खासदार एकत्र आहेत. पवार साहेब सांगतील 'ते धोरण आणि बांधतील ते तोरण', असे म्हणत त्यांनी आपण कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले. 'ऑपरेशन तुतारी' चालवले जात असल्याच्या चर्चेवर डॉ. कोल्हे यांनी कडक शब्दांत उत्तर दिले. पक्षाचे सर्व आठही खासदार पूर्णपणे एकसंध असून, ते शरद पवार यांच्या पाठीशी उभे आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमोल कोल्हे यांच्या भूमिकेला पाठिंबा आहे. 'ऑपरेशन तुतारी' सारख्या कोणत्याही मोहिमेची आपल्याला कल्पना नाही आणि सर्व खासदार पवारांसोबतच आहे. निधी मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. सध्या खासदारांना निधी मिळत नाही हे खरे आहे, पण याचे मुख्य कारण म्हणजे सध्या सरकारकडेच पैसे शिल्लक नाहीत.
- भास्कर भगरे, खासदार