![शरद पवांराच्या भेटीनंतर नितीन ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F03%2F%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक : पुढारी वृत्तसेवा-लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी नाशिकमधून इच्छूक असलेले नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी शरद पवारांनंतर सोमवारी(दि. २५) ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांची भेट घेत उमेदवारीबाबत चर्चा केली. अॅड. ठाकरे हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूकीला उभे राहतील, अशी चर्चा निवडणूक जाहीर होण्याच्या काही महिन्यांपूर्वीपासूनच होती. अॅड. ठाकरे यांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारीही सुरू केली आहे. यासाठी त्यांनी समर्थकांचा मेळावा देखील आयोजित केला होता. त्यानंतर सुरूवातीला त्यांनी भाजपकडे प्रयत्न केल्या. मात्र भाजपकडील इच्छूक उमेदवारांची फौज बघता त्यांनी पुन्हा शरद पवार गटाकडे आपला मोर्चा वळविला.
बारामतीत शरद पवार यांची भेट घेत नाशिक मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी मिळावी, अशी विनंती त्यांनी केली होती. मात्र, पवार यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ही जागा आमच्याकडे नाही. नाशिक मतदारसंघ शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना भेटावे. या शब्दात त्यांना सूचक उत्तर दिले होते. त्यानंतर अॅड. ठाकरे यांनी मविप्रच्या काही निवडक संचालकांसमवेत सोमवारी(दि.२५) मुंबईत खा. राऊत यांची भेट घेतली. शरद पवार यांच्यासमवेत झालेल्या चर्चेचा संदर्भ देत महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यास इच्छूक असल्याचे सांगितले. यावर राऊत यांनी यासंदर्भात सकारात्मक विचार करू, असे आश्वासन दिल्याचे अॅड. ठाकरे यांनी या भेटीनंतर दै. पुढारीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघातून एक मराठा उमेदवार देण्याचे घोषित केले आहे. यासंदर्भात अॅड. ठाकरे यांना विचारणा केली असता अद्याप जरांगे पाटील यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले.
हेही वाचा –