

त्र्यंबकेश्वर : येथील साधू-महंतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आखाड्यांना मिळणारा निधी जीएसटी सारख्या करकपातीने कमी पडत आहे. आश्रमांना देण्यात आलेल्या निधीत दुप्पट वाढ करावी, अशी मागणी केली. आनंद आखाड्याचे अध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी मुख्यमंत्र्यांकडे आखाडे आणि आश्रमांतर्फे माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत साधू महंतांची मागणी मान्य असल्याचे सांगितले. तेथे उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. यात प्रत्येक आखाड्याला ७कोटी रुपये, तर प्रत्येक आश्रमाला ३० लाख रुपये मिळणार आहेत.
येत्या काही दिवसांत याबाबत शासन आदेश काढण्यात येणार असल्याचे समजते. नाशिक येथे कुंभ भक्त्ती संगम सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री आले होते. या कार्यक्रमासाठी त्र्यंबकेश्वर येथील आखाडा तसेच आश्रमांचे साधू उपस्थित होते. यावेळी त्यांच्यापुढे साधूंची मागणी मांडण्यात आली.
त्र्यंबकेश्वरच्या आखाड्याला यापूर्वी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यात काही विकासकामांच्या निविदादेखील प्रसिद्ध झाल्या आहेत. काही कामांना प्रारंभ झाला आहे. तथापि, ५ कोटी रुपयांमधून १ कोटी ३० लाख रुपयांच्या दरम्यान जीएसटी आणि कर वजा होणार आहेत. त्यासाठी आणखी २ कोटी रुपये देण्याची साधू प्रत्येक आखाड्यांची मागणी होती. त्र्यंबकेश्वर येथे असलेले आश्रम आणि मठ यांचा सिंहस्थ कालावधीत महत्वपूर्ण योगदान राहाते. सिंहस्थ कुंभमेळा व्यतिरिक्त आश्रमांमध्ये वर्षभर भक्तांचा राबता असतो.
शासनाने देऊ केलेले १५ लाख रुपये कमी पडतील, अशी वस्तुस्थिती महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी स्पष्ट केली होती. त्या मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद देतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने प्रत्येक आखाड्याला ७ कोटी रुपये आणि प्रत्येक आश्रमाला ३० लाख रुपये देण्याचे मंजूर केले आहे. त्र्यंबकेश्वर येथील आखाडे आणि आश्रमाच्या खोळंबलेल्या कामांना आता वेग येणार आहे.