नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा बाजार समितीमध्ये कोथिंबिरीची आवक मंदावल्यामुळे कोथिंबिरीचे भाव जवळपास दीडशे रुपये जुडी असे गगनाला भिडले आहेत. मोसमात पहिल्यांदाच कोथिंबिरीने उच्चांक गाठल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या वाढीला पावसाचे पुनरागमनदेखील कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. गुरुवारी (दि. ७) सायंकाळी लिलाव प्रक्रियेत कोथिंबीरच्या काही वक्कलला १६ हजार रुपये शेकडा म्हणजेच १६० रुपये प्रतिजुडी बाजारभाव मिळाला. कोथिंबीर पाठोपाठ मेथी, शेपू या भाज्यांचे दरदेखील तेजीत आले आहेत. मेथी जुडीला ४७ तर शेपू ३० रुपये प्रतिजुडी दर मिळाला.
पावसाने उघडीप दिल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वच प्रकारच्या पालेभाज्या मालाची आवक वाढली होती. परिणामी, बाजारभाव नसल्याने अनेक कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांवर कोथिंबीर बाजार समितीत सोडून देण्याची वेळ आली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने त्याचा परिणाम कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालावर जाणवला.
गेल्या दोन आठवड्यांपूर्वी टोमॅटो, कांदा यांचे भाव जास्त होते. सहसा कोथिंबिरीचे भाव ऑक्टोबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये गगनाला भिडलेले असतात. मात्र, यावेळी सप्टेंबरमध्येच तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एका बाजूला पावसामुळे कोथिंबिरीची आवक कमी आहे, तर दुसऱ्या बाजूला शेतातील कोथिंबीर काढणीला यायला अद्याप पंधरा दिवसांचा अवकाश आहे, त्यामुळे बळीराजा संभ्रमावस्थेत आहे.
हेही वाचा :