नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुक्यातील वावी येथे सध्या संततधार पावसामुळे वातावरणात बदल झाला असून, रस्त्यांवर काही ठिकाणी डबके साचून डासांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्यसेवक व आशासेविका यांच्यामार्फत घरोघरी जाऊन स्वच्छता राखण्याचे, आजारपणाबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सध्या वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशा आजारांचे रुग्ण वाढत आहेत. खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होताना दिसत आहे. डासांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता घराजवळील डबके तसेच अनावश्यक वाढलेले गवत काढून टाकावे. परिसरामध्ये जंतुनाशक फवारणी करणे गरजेचे आहे. घर व घराशेजारील परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन स्थानिक आरोग्य प्रशासनाने केले आहे. तथापि, ग्रामपंचायतीने धुरळणी करावी, अशी मागणी होत आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी दररोज भांडे स्वच्छ धुवून पाणी भरावे व त्यावर झाकण ठेवावे. घर व परिसर स्वच्छ ठेवावे, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा. – डॉ. छाया राशिनकर, वैद्यकीय अधिकारी, वावी प्राथमिक आरोग्य केंद्र.