नाशिक : गणेशनगर, रामनगरमधील अंगणवाड्यांची दुर्दशा; मुलांच्या जीवाशी खेळ

नाशिक : गणेशनगर, रामनगरमधील अंगणवाड्यांची दुर्दशा; मुलांच्या जीवाशी खेळ
Published on
Updated on

कळवण; पुढारी वृत्तसेवा : कळवण शहरातील गणेश नगर व रामनगर येथील अंगणवाड्या कुपोषित झाल्या आहेत. अंगणवाडी परिसरात मोठं मोठी झाडे झुडपे मोठ्या प्रमाणत वाढली आहेत. अंगणवाडीमध्ये उंदरांनी व घुशीने पोखरले असल्याने ती मोडकळीस आली आहे. साप, उंदीर यासारख्या प्राण्यांचा वावर होत आहे. एकंदरीत अंगणवाडीची दुर्दशा झाली असताना प्रशासन मात्र मुलांच्या जीवाशी खेळ करत आहे. केंदीय राज्य मंत्री भारती पवार, आमदार नितीन पवार यांना अनेक वेळा याबाबत निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे अंगणवाडी कर्मचारी कल्पना पगार यांनी सांगितले.

भारतीय भाषांमध्ये अंगणवाडी शब्दाचा अर्थ अंगणातील निवारा असा आहे. भारत सरकारने १९७५ मध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाड्या चालू केल्या. त्याचा मुख्य उद्देश बालकांमधील कुपोषण हटविणे हा होता. सर्वसामान्य, गरीब कुटुंबातील बालकांना सकस आहार व मोफत शिक्षण मिळावे, या हेतून अंगणवाड्या स्थापन झाल्या. कळवण शहरातील गणेश नगर व रामनगर येथील अंगणवाड्यांमध्ये कोणत्याच सुविधा मिळत नसल्याने येथे बालकांचा सर्वांगिण विकास कसा होणार? भिंतींना तडे गेले असून आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कुंपण तयार झाल्याने साप व उंदीरांचा वावर आहे. याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. अंगणवाडी अपुऱ्या जागेत भरते तसेच याच्या भिंतीही पडण्याच्या मार्गावर असून किचनची दुरावस्था झाली आहे. शौचालयांचीही बिकट अवस्था झाली आहे. अंगणवाडीच्या बाजूलाच कचऱ्याचे ढिग साचले आहेत. येणारे-जाणारे नागरिक भिंतीवरच लघुशंका करतात. यामुळे दुर्गंधी पसरली आहे. यातून बालकांच्या आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन, जिल्हा परिषद अंगणवाडी विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तात्काळ अंगणवाडी नुतनीकरण करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

कळवण शहरातील गणेश नगर येथील इंडेन गॅस जवळच्या अंगणवाडीची दुरावस्था झाली आहे. लहान बालकांचे आरोग्य, सुरक्षा धोक्यात आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे काही दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण? अंगणवाडया डिजिटल केल्या तर प्रशासनाकडून मोठा गाजावाजा करून जबाबदारी घेते, मग ही जबाबदारी कोणाची. एकात्मिक विभाग, नगरपंचायत एकमेकांकडे बोट दाखवून मोकळे होतात, मग या अंगणवाडींचा वाली कोण? कळवण शहरातील बऱ्याच अंगणवाडया अशाच स्थितीत आहेत. शासनाने तात्काळ त्या दुरुस्त कराव्या.

– प्रदिप पगार, छावा क्रांतिवीर सेना

२००६ साली अंगणवाडी बांधकाम झाले आहे. अंगणवाडीची पूर्णतः दुरावस्था झाली असून साप, उंदीर सारखे प्राण्यांचा नेहमी वावर आहे. मुलांच्या व आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अंगणवाडी दुरुस्तीबाबत गटविकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी, खासदार भारती पवार, आमदार नितीन पवार यांना अनेकवेळा निवेदन देऊन देखील कोणी पाहणीसाठी सुद्धा आले नाही. त्यामुळे तात्काळ पाहणी करून दुरुस्ती करावी.

– कल्पना पगार, अंगणवाडी कर्मचारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news