![नाशिक : कानळदचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार, ‘इतक्या’ कोटींच्या निधीस मंजुरी](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F11%2F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A4%BE.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून निफाड तालुक्यातील कानळद येथे जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे कानळद नळ पाणीपुरवठा योजनेस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. योजनेसाठी चार कोटी ९४ लाख निधी प्राप्त झाला आहे. लवकरच या योजनेच्या कामाला सुरुवात होणार असून, कानळदकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.
येवला मतदारसंघातील विविध गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी भुजबळ यांनी पुढाकार घेतलेला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत येवला मतदारसंघात विविध गावांमध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या असून त्यांची कामे सुरू आहेत. काही योजना या पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहेत.
निफाड तालुक्यातील मौजे कानळद नळ पाणीपुरवठा योजनेचा दरडोई खर्च हा विहीत निकषापेक्षा अधिक असल्यामुळे ही नळ पाणीपुरवठा योजनेस मंजुरी देण्यासाठीचा प्रस्ताव जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शासनाच्या मान्यतेकरिता सादर केला आहे. त्यानंतर प्रस्तुत नळ पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाच्या अधीक्षक अभियंता यांनी तांत्रिक मान्यता प्रदान केली आहे. यासाठी कानळदचे सरपंच शांताराम जाधव आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा पाठपुरावा सुरू होता. कानळद येथील दरदिवशी ५५ लिटर दरडोई क्षमतेच्या चार कोटी ९४ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मान्यता देण्यात आली आहे.