नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सामाजिक समतोल राखण्यासाठी समाजात स्त्री-पुरुष समानता असणे महत्त्वाचे आहे. वैज्ञानिक प्रगतीमुळे गर्भलिंग निदान सोपे झाले आहे. यंत्राच्या गैरवापरामुळे स्त्रीभ्रूणहत्या वाढत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष जन्मदरात मोठी तफावत निर्माण होत आहे, असे प्रतिपादन नगर परिषदेचे शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांनी केले.
दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत लिंग आधारित भेदभाव आणि हिंसा समाप्त करण्याच्या दृष्टीने नगरपरिषद येथे 'नयी चेतना : पहल बदल की' कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्याधिकारी संजय केदार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. उपमुख्याधिकारी रोहित पगार, अनिल जाधव, भूषण नवाल, प्रमोद पाटील, राहुल मुंगसे, रोषन भाटजिरे, महामित्र दत्तात्रय वायचळे, संगीता चौधरी, निलोफर सय्यद यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संगीता चौधरी यांनीही मार्गदर्शन केले. महिलांनी 'नही सहेंगे, नही कहेंगे' अशा घोषणा देत लिंगभाव समानता प्रतिज्ञा घेतली. यावेळी अनुराधा लोंढे, प्रीती लोंढे, अर्चना आग्रे, आश्विनी वैद्य, रोहिणी सोनावणे, शुभांगी उकाडे, छाया देशमुख, सुनीता पाबळे, नीशा कापुरे, शोभा जाधव आदींसह महिला उपस्थित होत्या.
महिलांनी हिंसेचा प्रतिकार करावा : वायचळे
समाजात लिंग आधारित भेदभाव व हिंसा संपविण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन वेळीच हिंसेचा प्रतिकार करणे आवश्यक असल्याचे मत दत्तात्रेय वायचळे यांनी व्यक्त केले.