नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पावसाळा लांबल्याने नाशिक शहरासह परिसरात ठिकठिकाणी पाण्याचे साठे निर्माण झाल्याने डासांच्या उत्पत्तीस्थानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव कायम राहिल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात डेंग्यूचे ७३ नवे रुग्ण आढळले आले असून, रुग्णांची एकूण संख्या ४०० हून अधिक झाली आहे.
यंदा पावसाळा लांबल्याने साचलेल्या पाण्याच्या डबक्यांत डासांचा प्रादुर्भाव निर्माण होऊन डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया यांसारख्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. औषध आणि धूर फवारणी नियमित होत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी त्यात वाढच होताना दिसून येत आहे. ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ९९ रुग्ण होते. सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्येत वाढ होऊन १३९ पर्यंत आकडा गेला. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्येत ७३ ने वाढ झाली. डेंग्यूचा प्रादुर्भाव संपूर्ण शहरात दिसून येत असला तरी पंचवटी विभागात या आजाराचे सर्वाधिक ११३ रुग्ण आढळून आले आहेत. नाशिकरोड व सिडको विभागात प्रत्येकी ६९, नाशिक पूर्व ५५ तर सातपूर विभागात ५४ रुग्ण आहेत. डेंग्यू पाठोपाठ चिकुनगुनियाचे आतापर्यंत २८ रुग्ण आढळले आहेत.