![पंचवटी : मोहमाळ येथील श्री भावेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी स्वामी माधवगिरी महाराज, स्वामी संतोषगिरी महाराज, स्वामी शिवगिरी महाराज, स्वामी गणेशगिरी महाराज आदी. (छाया: रविंद्र आखाडे)](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F06%2F%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
मनुष्य जीवनाला ग्रंथ, संत आणि पंथांचा आधार असलाच पाहिजे. कोणत्याही संतांचे चरित्र वाचल्याने जीवनात सकारात्मक बदल घडत असल्याचे प्रतिपादन स्वामी माधवगिरी महाराज यांनी केले.
सुरगाणा तालुक्यातील अंबाठा येथील मोहमाळ येथील श्री भावेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. स्वामी माधवगिरी महाराज म्हणाले की, गुरूंची सेवा करणार्या शिष्याच्या अंत:करणात राष्ट्रसंत जनार्दनस्वामींचा सेवाभाव असला पाहिजे. अध्यात्म भक्तीत सेवाभाव महत्त्वाचा असून, जनार्दनस्वामींना अभिप्रेत असलेले कार्य काशीनाथबाबा यांच्याकडून घडले, असेही माधवगिरी महाराजांनी सांगितले. सुरगाणा तालुक्यातील अनेक आदिवासी पाड्यांवर गेल्या 27 वर्षांपासून जनार्दनस्वामी पालखी सोहळा पार पडत आहे. त्यासाठी स्वामी माधवगिरी महाराज, स्वामी संतोषगिरी महाराज प्रयत्नशील आहेत. यावेळी श्री भावेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा आणि शिवपंचायतन यज्ञ तसेच श्री राष्ट्रसंत जनार्दनस्वामी आणि रामभक्त मारुती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. व्यासपीठावर स्वामी मधुगिरी महाराज, स्वामी संतोषगिरी महाराज, 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज, उज्जैन येथील स्वामी मुनिशरणदास महाराज, काशीनाथबाबा, स्वामी परशुरामगिरी महाराज, स्वामी श्रवणगिरी महाराज, स्वामी जयरामगिरी महाराज, स्वामी गणेशगिरी महाराज, नारायण गावित, संतोष काबरा आदी उपस्थित होते.