![सिन्नर : विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करताना भाजपचे कार्यकर्ते.](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F01%2F%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्याबाबत केलेल्या विधानाचा निषेध करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात अजित पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
अजित पवार यांनी, छत्रपती संभाजी राजे धर्मवीर नसून, ते स्वराज्यरक्षक असल्याचे अपमानास्पद उद्गार काढले होते. त्यावर संतप्त भाजप पदाधिकार्यांनी आंदोलन केले. पवार यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्याबद्दल अपमानस्पद वक्तव्याचा निषेध यावेळी करण्यात आला. यावेळी भाजप तालुका प्रभारी जयंत आव्हाड, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, शहराध्यक्ष बाळासाहेब हांडे, मुकुंद काकड, विनोद आंबोले, पंढरीनाथ सांगळे, रामदास भोर, विठ्ठल जपे, विजया केकाणे, दर्शन भालेराव, रुपाली काळे, योगिता खताळे, रोहिनी कुरणे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संभाजीराजे धर्मवीरच!
औरंगजेबाने अनेकवेळा छत्रपती संभाजी राजेंना, धर्म सोड जीवदान देतो, असे आवाहन केले होते. मात्र डोळ्यात सळया खुपसल्या, तरी मी माझा हिंदू धर्म सोडणार नसल्याचे राजेंनी सांगितले. असे 40 दिवस मृत्यूशी झुंज देत असलेले संभाजी राजे धर्माबद्दल कट्टर होते. त्यांना त्यांच्या जिवापेक्षा धर्म प्यारा वाटला आणि ते धर्मवीरच, हे त्रिवार सत्य आहे. सूर्य, चंद्र असेपर्यंत ते धर्मवीरच राहणार आहे. अशी सगळी मानसिकता या संपूर्ण देशात आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.