नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा- नंदुरबार तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता तातडीच्या उपाययोजना करणे चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून तापी-बुराई योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करणे चालू असून, त्याला यश आले आहे. त्या कामाला आवश्यक असलेली शासकीय मान्यता येत्या पंधरा दिवसांत प्राप्त होईल, अशी माहिती आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.
यावर्षी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे दिसत आहेत. त्या सर्व पार्श्वभूमीवर प्रलंबित तापी-बुराई योजना तातडीने पूर्णत्वास येणे आवश्यक बनले आहे. या संदर्भाने माहिती देताना डॉ. गावित म्हणाले की, नंदुरबार तालुक्यातील शेती तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यावर चर्चा केली होती. प्रलंबित तापी-बुराई योजनेचा उर्वरित टप्पा पूर्ण केला जावा, अशी आग्रहाची मागणीही मांडली होती. त्याला आता यश मिळाले असून, येत्या पंधरा दिवसांत तापी-बुराई योजनेला आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय मान्यता प्राप्त होतील आणि पुढील चार महिन्यांत तापी-बुराई योजनेचे काम पूर्णत्वास येऊन पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा होईल, असा दावा त्यांनी केला.
हेही वाचा ;