नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
मोबाइल चोरी करणाऱ्या मध्य प्रदेशातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला लासलगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपींकडून सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सहायक पो. नि. राहुल वाघ यांनी दिली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र गोसावी यांचा मोबाइल लासलगाव येथील आठवडे बाजारातून चोरीस गेला होता. लासलगाव आठवडे बाजारात रविवारी पोलिसांचे पथक गस्त घालत असताना त्यांना दोन संशयित फिरताना आढळले. त्यांना ताब्यात घेत पोलिसांनी चौकशी केली असताना मोबाइल चोरीची कबुली दिली.
या दोघा पकडलेल्या संशयितांचे नाव जिद्दी साबुद्दीन पारधी (वय २०) आणि वीरेंद्र लखन सिलारे (वय २४) असे असून, ते हरदा जिल्ह्यातील झिरी येथील रहिवासी आहेत. त्यांनी नाशिक जिल्हयातून इतर आठवडे बाजारातून मोबाइल फोन चोरी केल्याबाबत कबुली दिली असून, त्यांच्याकडून सुमारे एक लाख १३ हजारांचे ९ मोबाइल फोन पोलिसांना सापडले. या दोन्ही आरोपींना निफाड न्यायालयात हजर केले असता त्यांना १६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. यापूर्वी आठवडे बाजारातून मोबाइल चोरी करणाऱ्या झारखंडच्या टोळीला लासलगाव पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून सुमारे साडेतीन लाखांचे २४ मोबाइल जप्त केले होते.