

जळगाव: लोकसभेच्या रणधुमाळीसाठी संघटनात्मक बांधणीच्या निमित्ताने जळगावात आलेल्या खासदार संजय राऊत यांनी आज राज्य सरकार आणि जळगावच्या पालकमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला.
"जिल्ह्यात अवकाळीने शेती उद्ध्वस्त झाली असताना 'संकटमोचक' म्हणवून घेणारे नेते कुठे आहेत? हे फक्त राजकीय संकटे सोडवणारे आणि पक्ष फोडणारे संकटमोचक आहेत का?" असा बोचरा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. जळगाव जिल्ह्यात सध्या 'पोलीस वर्दीतली गुंडगिरी' सुरू असून सत्ताधारी विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी पोलिसांचा गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार 'ठार' असंवेदनशील
जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, सरकारमधील एकाही मंत्र्याला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या संवेदना जाणून घेण्यास वेळ नाही. राज्याचे मंत्री आणि पालकमंत्री केवळ स्वतःच्या राजकीय स्वार्थात मग्न आहेत. सरकारमधील मंत्र्यांच्या संवेदना आता 'ठार' झाल्या आहेत, अशा शब्दांत राऊत यांनी संताप व्यक्त केला.
'शिंदे' गट भाजपमध्ये विलीन होणार?
जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असे संकेत राऊत यांनी दिले. विशेषतः पारोळा आणि मुक्ताईनगरचे आमदार हे संकटमोचकांच्या (गिरीश महाजन) संपर्कात असून, ते पुढची निवडणूक भाजपकडूनच लढतील, असा दावा त्यांनी केला. "भविष्यात दादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना पूर्णपणे फुटून त्यांचे २५ ते ३० आमदार थेट भाजपमध्ये जातील," असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
बारामती, राहुरी निवडणुकीबाबत महाविकास आघाडीची भूमिका
बारामती आणि राहुरीच्या आगामी निवडणुकांसंदर्भात बोलताना राऊत म्हणाले की, "महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करू. बारामतीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा अधिकार आहे, तिथे चर्चा करून निर्णय घेतला जाईल. लोकशाहीत कोणालाही निवडणूक लढवण्यापासून रोखता येत नाही, पण महाविकास आघाडी एकजूट राहील."
मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर प्रहार
मुंबई महापालिकेतील २० हजार कोटींचे टेंडर रद्द केल्याबद्दल त्यांनी नवीन आयुक्तांचे अभिनंदन केले. "प्रशासकीय काळात मुंबईची लूट झाली, हे आम्ही सातत्याने सांगत होतो. नगरविकास खात्याच्या माध्यमातून झालेला हा भ्रष्टाचार आता उघड होत आहे," असे ते म्हणाले.
जळगावात पोलीस गणवेशातली हुकूमशाही
जळगाव जिल्ह्याबद्दल बोलताना त्यांनी पोलीस प्रशासनावर कडक ताशेरे ओढले. "जिल्ह्यात राजकीय हुकूमशाही सुरू असून पोलीस वर्दीतले गुंड विरोधकांचे दडपण करण्यासाठी वापरले जात आहेत. पोलीस गणवेशातील ही हुकूमशाही जनता खपवून घेणार नाही," असा इशारा त्यांनी दिला.