

जळगाव ट्रान्सपोर्ट नगरमध्ये डिझेल तुटवड्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला असून सुमारे ४०० गाड्या जागेवरच उभ्या राहिल्या आहेत. डिझेल मिळवण्यासाठी चालकांची धावाधाव सुरू असून मालवाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
जळगाव- डिझेलच्या तीव्र टंचाईचा भीषण फटका जळगावच्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाला बसला आहे. संपूर्ण ट्रान्सपोर्टचा चक्काजाम झाला आहे. जळगावच्या हद्दीतून देशभरात माल वाहतूक करणाऱ्या तब्बल ३०० ते ४०० गाड्या सध्या ट्रान्सपोर्ट नगरमध्ये चाके रुतून उभ्या आहेत. तर डिझेल मिळेल, या आशेने अनेक गाड्या पेट्रोल पंपांवर तासनतास रांगेत उभ्या असल्याचे विदारक चित्र आहे. या संकटामुळे दररोज तब्बल ४४० ते ५०० कोटी रुपयांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे.
जीवाच्या भीतीने चालक धास्तावले; 'फुल टँक' द्या, मगच गाडी हलवू!
एका ट्रकमध्ये साधारण १५ ते २० लाखांचा माल लोड केलेला असतो. मात्र, रस्त्यात जर डिझेल संपले आणि गाडी निर्जन स्थळी उभी राहिली, तर मालाची चोरी होण्याची मोठी भीती चालकांना सतावत आहे. "रस्त्यात सुरक्षा कोण देणार? डिझेल अभावी अडकून पडलो आणि दरोडा पडला तर आम्ही काय करायचे?" अशा जीवाच्या भीतीने चालक गाडी घेऊन जाण्यास साफ नकार देत आहेत. "आम्हाला डिझेल फुल करून द्या, तरच आम्ही स्टिअरिंगवर हात ठेवू," अशी ठाम भूमिका चालकांनी घेतली आहे.
तळपत्या उन्हात डिझेलसाठी रांगेत उभे राहूनही ट्रक चालकांना केवळ २० ते २५ लिटर इंधन दिले जात आहे. त्यातही काही ठिकाणी 'कारचालक' ट्रकला डिझेल देण्यास मनाई करत असल्याचे समोर आले आहे.
घरांचे हप्ते भरायचे कसे?
या संकटामुळे ट्रान्सपोर्ट क्षेत्राचे कंबरडेच मोडले आहे. जळगावात दररोज ४०० ते ५०० ट्रकची ये-जा असायची, ती आज घसरून अवघी १०० ते सव्वाशेवर आली आहे. पूर्वी ज्या गाड्या महिन्याला ५ ते ६ ट्रिप मारायच्या, त्या गाड्या आता कशाबशा फक्त २ ट्रिप मारू शकत आहेत. गाड्या बंद असल्याने बँकांचे फायनान्सचे हप्ते थकत आहेत. ड्रायव्हरचा पगार कुठून द्यायचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या विवंचनेत ट्रक मालक अडकले आहेत. नागरिक आता डिझेलसाठी आणि पेट्रोल साठी रांगा लावत आहेत.
डिझेलच्या या तीव्र टंचाईमुळे आमचा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. दररोज कोट्यवधींचे नुकसान जळगावकरांना सहन करावे लागत आहे. प्रशासनाने तात्काळ यामध्ये हस्तक्षेप करून ट्रकला किमान आवश्यकतेनुसार ३०० ते ४०० लिटर डिझेल उपलब्ध करून द्यावे.
- अशोक वाघ (उपाध्यक्ष, जळगाव ट्रक असोसिएशन ट्रान्सपोर्ट नगर)
चालक जीवाच्या भीतीने गाडी बाहेर काढायला तयार नाहीत. महिन्याला ५ ट्रिप मारणाऱ्या गाड्या आज २ ट्रिपवर आल्या आहेत. इंधनाचा तुटवडा तात्काळ दूर झाला नाही तर संपूर्ण जळगावमधील पुरवठा साखळी विस्कळीत होईल.
- महेंद्र अबोटी (सेक्रेटरी, जळगाव ट्रक असोसिएशन)
डिझेलच्या नावावर चालकांची अडवणूक आणि आर्थिक लूट थांबली पाहिजे. एखादा पंप फक्त ट्रक चालकांसाठी राखीव करावा कारण ट्रकचालक हे अन्नपदार्थांची सुद्धा वाहतूक करीत असतात आमचे ट्रक थांबले तर देशाचा चाक थांबेल, याची जाणीव शासनाने ठेवावी.