

Jalgaon Police Road Accident Review Meeting
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील महामार्ग आणि रस्त्यांवर सुरू असलेल्या मृत्यूच्या तांडवावर अखेर पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. वाढत्या प्राणांतिक अपघातांचा आढावा घेण्यासाठी पोलीस विभागातर्फे आयोजित उच्चस्तरीय बैठकीत, २०२६ मध्ये अपघाती मृत्यूंचे प्रमाण किमान १० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केवळ कागदी घोडे न नाचवता आता रस्त्यावर प्रत्यक्ष कारवाईचा 'ब्रेक' लागणार का? याकडे जळगावकर लक्ष लावून आहेत.
२०२४ मध्ये जिल्ह्यात ४७२ जणांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला होता. २०२५ मध्ये हे प्रमाण ६ टक्क्यांनी घटून ४४५ वर आले होते. मात्र, २०२६ च्या सुरुवातीलाच ही स्थिती पुन्हा हाताबाहेर जाताना दिसत आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांतच तब्बल १०० मृत्यूंची नोंद झाली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत मार्चपर्यंत २६ अधिक अपघात झाले आहेत.
अतिवेग: ३८% (सर्वात प्रमुख कारण)
रॉन्ग साईड ड्रायव्हिंग: २०%
सुरक्षा साधनांचा अभाव (हेल्मेट/सीटबेल्ट): १५%
मद्यपान करून वाहन चालवणे: १२%
थकवा व डुलकी: ८%
धोकादायक ओव्हरटेकिंग: ७%
पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार जळगाव पोलिसांनी आता कंबर कसली आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या प्रभारींना त्यांच्या क्षेत्रातील 'ब्लॅक स्पॉट्स' (अपघातप्रवण क्षेत्रे) तपासण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, रस्ते बांधणीतील त्रुटी सुधारण्यासाठी NHAI, PWD आणि महानगरपालिकेशी दोन दिवसांत पत्रव्यवहार करून त्यांना जबाबदार धरले जाणार आहे.
१. विभागीय समन्वय: महामार्गावरील खड्डे आणि स्ट्रक्चरल त्रुटींसाठी संबंधित विभागांशी थेट संवाद.
२. प्रबोधन: जळगाव, भुसावळ आणि चाळीसगावमधील ट्रक चालकांसाठी विशेष कार्यशाळा.
३. कठोर कारवाई: मद्यपी आणि बेशिस्त वाहनचालकांवर दररोज विशेष मोहीम.
४. गोल्डन अवर मदत: महामार्गावरील धाबा चालकांना प्रथमोपचार प्रशिक्षण देणे आणि वाहनांत फर्स्ट-एड किट अनिवार्य करणे.
५. जनसहभाग: स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रस्ते सुरक्षा जनजागृती मोहिमेवर भर.