जळगाव : पुढारी वृत्तसेवा- जळगावमधील मण्यारखेडा तलावातील संपू्र्ण माशांचा मृत्यू झाला आहे. सकाळी तलावावर मासेमारी करण्यासाठी मच्छीमार आल्यावर त्यांना तलावाच्या किनाऱ्यावर माशांचा मृत्यू झालेला दिसून आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाल्यामुळे सर्वांना धक्का बसला. यामुळे मासेमारी करणाऱ्या मासेमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या माशांचा मृत्यू कसा झाला याबाबत कोणीच काही सांगू शकलेले नाही.
जळगाव मधील मन्यारखेडा येथे असलेल्या तलावात आदिवासी मच्छीमार, सहकारी संस्था मधील सदस्य या तलवावर मासेमारीचे व्यवसाय करतात. या तलावावर मासेमारी करून तब्बल 15 ते 20 मच्छीमार हे आपला उदरनिर्वाह करतात. (दि.15) रोजी सकाळी नेहमीप्रमाणे मासेमारी करण्यासाठी मण्यारखेड तलावावर आले असता तलावाच्या काठावर मोठ्याप्रमाणात मृत मासे आढळले. तलावापासून काही किलोमीटर अंतरावर एमआयडीसी असून या एमआयडीसीतील केमिकल कंपन्यांचा विषारी पाणी हे तलावात सोडलं जात असल्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. केमिकल कंपन्याच्या सांडपाण्यासह तलावात सोडले जात असलेल्या विषारी पाण्यामुळे तलावातील तब्बल 50 ते 60 क्विंटल पेक्षा जास्त माशांचा मृत्यू झाला आहे.
मात्र तलावातील संपूर्ण मासे मृत झाल्यामुळे आता उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न असून भरपाई मिळण्याची मागणी मच्छीमार सोसायटीच्या वतीने करण्यात आली आहे. घटनेची चौकशी करण्यात येऊन ज्या एमआयडीसी कंपन्यांचे पाणी सोडण्यात येतं त्यांच्यावर कारवाई करावी तसेच दूषित पाणी दुसऱ्या इतरत्र ठिकाणी सोडलं जावं अशी मागणी करण्यात येत आहे. या ठिकाणी मन्यारखेडा गावासह परिसरातील काही गुरढोरं सुद्धा पाणी पीत असतात. ग्रामस्थांच्या वतीने वेगवेगळ्या कारणासाठी पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे तत्काळ हा तलाव बंद करण्यात यावा अन्यथा या तलावातील विषारी पाण्यामुळे दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वीसुद्धा अशाच पद्धतीचा प्रकार घडला होता. तक्रारी सुद्धा करण्यात आला होत्या. मात्र प्रदूषण मंडळ असेल किंवा जिल्हा प्रशासनाच्या वतीने कुठलीही कारवाई न करण्यात आल्याने पुन्हा तशा प्रकारची घटना घडली आहे.
मनेरखेडा येथील तलावामध्ये आदिवासी संस्था मासेमारीचा व्यवसाय चालवित आहे. या तलावातील जवळपास 40 ते 50 टन मासे मारले गेले आहेत. या तलावात एमआयडीसी मधून येणारे पाणी नालीद्वारे सोडण्यात आल्यामुळे हा प्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दोन वर्षांपूर्वी अशीच घटना घडली होती. त्यावेळेसही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही असे आदिवासी मच्छीमारी सहकारी संस्थेचे सचिव यांची प्रतिनिधी बोलताना सांगितले. – कडू सपकाळे, सचिव आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था
हेही वाचा –