

Jalgaon Municipal Corporation NCP Protest
जळगाव : अनियमित व कमी दाबाचा पाणीपुरवठा, खराब रस्ते, कचऱ्याचे ढीग, बंद पथदिवे आणि मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव या नागरी समस्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गुरुवारी (दि.२०) महापालिकेवर धडक मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्त्यांनी सुमारे दोन तास जोरदार घोषणाबाजी करत प्रशासन व भाजप सत्ताधाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला.
महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त व महापौरांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याची क्षमता नसताना वॉटर मीटर बसवून मनमानी पाणीपट्टी वसूल करण्याची तयारी का, असा सवाल पक्षाने उपस्थित केला.
पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसाठी प्रत्येक प्रभागात निधी मंजूर करूनही कामे सुरू नसल्याचा आरोप करण्यात आला. कामास टाळाटाळ करणाऱ्या मक्तेदारांचे करार रद्द करून नवीन मक्तेदार नेमावेत, अशी मागणी करण्यात आली. महामार्गावरील बंद पथदिवे, अजिंठा चौफुली ते विमानतळ मार्गावरील रखडलेले सौर पथदिवे आणि कचऱ्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या प्रश्नांकडेही लक्ष वेधण्यात आले.
यावेळी शिवाजीनगर उड्डाणपुलावरील खड्डे बुजवणे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवणे, उड्डाणपुलावर लोखंडी शिडी उभारणे तसेच मेहरुण शिवारातील स्मशानभूमीत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
१५ दिवसांत प्रश्न मार्गी न लागल्यास महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अशोक लाडवंजारी यांनी दिला. आंदोलनात कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन सर, प्रदेश चिटणीस प्रतिभाताई शिरसाट, विकासदादा पवार, युवक महानगर जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहरभाई पठाण, किरणभाऊ राजपूत, माजी नगरसेवक राजूभाऊ मोरे, माजी नगरसेवक सुनीलभैय्या माळी, रिंकू चौधरी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गौरव वाणी, प्रा. जयप्रकाश महाडिक, गिरीश सांगळे, गणेश पाटील आदीसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.