

Jalgaon heatwave alert
जळगाव : जळगावकरांना आता उन्हाच्या चटक्यांनी अक्षरशः भाजून काढायला सुरुवात केली आहे. अवघ्या २४ तासांत किमान तापमानात ४.४ अंश सेल्सिअसची मोठी वाढ झाल्याने रात्रीचा उकाडाही असह्य झाला आहे.
आज कमाल तापमानाने ४१.६ अंशांचा टप्पा गाठला आहे. ममराबाद वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत जिल्ह्याचा पारा ४२ ते ४३ अंशांवर जाण्याची दाट शक्यता असून, प्रशासनाने नागरिकांना दुपारी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. गेल्या दोन दिवसांतील आकडेवारी पाहता सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे.
१२ एप्रिल
४१.०°C कमाल तापमान
२०.०°C किमान तापमान
५१% आर्द्रता (RH)
१३ एप्रिल
४१.६°C कमाल तापमान
२४.४°C किमान तापमान
५१% आर्द्रता (RH)
केवळ दिवसाच नव्हे, तर रात्रीच्या तापमानातही कमालीची वाढ झाली आहे. किमान तापमान थेट २४.४ अंशांवर गेल्याने रात्रीचा गारवा गायब झाला असून घराघरांत कूलर आणि एसीचा वापर वाढला आहे. आज कमाल तापमानात ०.६ अंशांची वाढ नोंदवली गेली असली, तरी वाढत्या आर्द्रतेमुळे उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे.
ममराबाद वेधशाळेच्या माहितीनुसार, वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. उष्माघाताचा (Heat Stroke) धोका लक्षात घेता, दुपारी १२ वाजेनंतर आणि विशेषतः दुपारी २ ते ४.३० या वेळेत नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे.
बाहेर जाताना डोक्याला रुमाल किंवा टोपीचा वापर करा. भरपूर पाणी प्या आणि लिंबू सरबत, ताक यासारख्या पेयांचे सेवन करा.वातावरणात होणाऱ्या या बदलामुळे चक्कर येणे, डिहायड्रेशन होणे असे प्रकार घडू शकतात, त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.