

Gulabrao Patil on Missing Link' project
जळगाव, पुढारी वृत्तसेवा : "कोणताही मोठा प्रकल्प होत असताना त्यात छोट्या-मोठ्या चुका होतच असतात. त्यामुळे मिसिंग लिंक प्रकरणावरून एवढा आकांडतांडव करण्याची गरज नाही. विरोधकांच्या वृत्तीवर आक्षेप घेत, "९९% काम चांगले झाले असताना सर्वच काम खराब झाले असे म्हणणे चुकीचे आहे," अशा शब्दांमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिसिंग लिंकच्या कामावर टीका करणाऱ्या विरोधकांना आज (दि. ११ जुलै) सुनावले. "पिक्चर संपल्यावर नवीन पिक्चर सुरू करणे एवढे सोपे नसते, त्यासाठी नट तसा असावा लागतो," अशा शब्दांत त्यांनी एकनाथ खडसेंनाही लक्ष्य केले.
माध्यमांशी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या वादावर सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले. ते म्हणाले, "आजपर्यंत कोणत्याही सरकारच्या काळात झाली नाहीत एवढी कामे महायुती सरकारच्या काळात झाली आहेत. समृद्धी महामार्ग आणि ग्रामीण रस्तेही या काळात सुधारले आहेत. एखादा मोठा प्रकल्प करताना किरकोळ चुका होतात, पण ९९% काम चांगले झाले असताना केवळ चुकांवरून राजकारण करणे योग्य नाही."
विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांच्या भेटीवर गुलाबराव पाटील म्हणाले की, यांची भेट कशासाठी घेतली हे माहिती नाही. पिक्चर संपल्यावर नवीन पिक्चर सुरू करणे एवढे सोपे नसते, त्यासाठी नट कसा असावा लागतो. इतना तुटा हु चुनें से बिखर जाऊंगा, तुम अगर और दुवा देंगे तो मर जाऊंगा, अशा खास शायरीतून त्यांनी खडसेंवर निशाणा साधला. त्या घरात जाऊन आता खडसेंना काहीही भेटणार नाही. ते केवळ कुटुंबियांची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही टोलाही त्यांनी लगावला.
एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांची विधानभवनात भेट घेतली. भेट घेतली म्हणून लगेच शंका का घ्यावी? कोण कोणाचीही भेट घेऊ शकतो. शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते आहेत. ते माजी मुख्यमंत्री आहेत, मी देखील त्यांची भेट घेऊ शकतो. यात गैर काय?, असा सवाल करत भेटीकडे शंका घेण्यासाठी काहीही नाही, मात्र सध्या राज्यात शंकेचा माहोल आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून खासदार ओम बिर्लांना भेटले. श्रीकांत शिंदे हे आमच्या पक्षाचे युवा नेते आहेत. एक खासदार दुसऱ्या खासदाराला किंवा लोकसभा अध्यक्षांना भेटू शकतो, यात काहीही विशेष किंवा चुकीचे नाही," असेही गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.