Lok Sabha Election 2024 | महायुती फार काळ टिकणार नाही; लोकसभेपूर्वीच गिरीश महाजनांनी दिले संकेत | पुढारी

Lok Sabha Election 2024 | महायुती फार काळ टिकणार नाही; लोकसभेपूर्वीच गिरीश महाजनांनी दिले संकेत

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : महायुतीमधील सहभागी असलेले पक्ष फार काळ सोबत राहणार नाहीत, कारण लोकांचा यांच्यावर विश्वास राहिलेला नाही, असे वक्तव्य महाराष्ट्राचे संकट मोचक व भाजपचे नेते व स्टार प्रचारक गिरीश महाजन यांनी जामनेर येथे पत्रकारांशी बोलताना केले. युतीमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना शून्य किंमत असून, जास्त दिवस ते सोबत राहणार नसल्याचे एक सूचक वक्तव्य नामदार गिरीश महाजन यांनी केले. (Lok Sabha Election)

युतीतील पक्ष एकत्र राहिलेच तरी लोकांचा विश्वास नाही

जामनेर येथील कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नामदार गिरीश महाजन म्हणाले की, ज्याप्रमाणे आघाडीमध्ये भांडणे सुरू आहेत. त्याचप्रमाणे महायुतीची परिस्थिती आहे. अजूनही भांडणे सुरू आहेत. ही भांडणे टोकाची करत आहेत. मैत्रीपूर्ण लढत करू असे युतीमधील पक्षांकडून दावा केला जात आहे. परंतु हे  फार काळ सोबत राहणार नाहीत असे वाटते आणि राहिलेच तर लोकांचा त्यांच्यावर  विश्वास राहिलेला नाही, असेदेखील गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. (Lok Sabha Election)

लोकांना केवळ मोदींचे नेतृत्व मान्य-गिरीश महाजन

लोकांना एकच नेतृत्व म्हणजे मोदींचे नेतृत्व मान्य आहे. त्यांना पंतप्रधान करायचंय, कोणीही निवडणुकीमध्ये युती, आघाडी, महाआघाडी केल्या तरी, त्याचा परिणाम मतदानावर होणार नाही. याचा अर्थ असा की मतदार फक्त भाजपालाच वोटिंग करणार असल्याचा दावादेखील गिरीश महाजन यांनी आपल्या वक्तव्यातून माध्यमांशी बोलताना केला. (Lok Sabha Election)

‘या’ महिला उमेदवारांना निवडून आणण्याचा संकल्प

पुढे बोलताना ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघात रक्षा खडसे व जळगाव लोकसभेमध्ये स्मिता वाघ या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प आम्ही केला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

केवळ महाराष्ट्र आणि दिल्लीतच मविआची युती

एनडीफीडी अशी कोणतीही आघाडी असो, त्यांचे बारा वाजले आहेत. महाविकासआघाडीमध्ये आता कोणीच राहिलेले नाही. यामध्ये १८ ते २५ पक्ष एकत्र आलेले होते. आता फक्त काँग्रेस, उद्धव ठाकरेंची कोणतीतरी शिवसेना व शरद पवारांची राष्ट्रवादी हे तीनच पक्ष शिल्लक राहिलेले राहिले आहेत. फार कोणी त्या ठिकाणी नाहीत. महाराष्ट्रात व दिल्लीत यांची युती दिसते. त्याचेही तीन तेरा व बारा वाजले आहेत, असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले आहे.

हेही वाचा: 

Back to top button