जळगाव; पुढारी वृत्तसेवा : राज्यसभा निवडणुकीत संख्याबळ नसतानाही भाजपने विजयी मिळवत महाविकास आघाडीला पराभूत केलं. यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टिका केली. 'उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला दहा वर्षे पाठीमागे नेलं आणि राज्यसभेच्या पराभवामुळे त्यांची नाच्चकी झाली, अशी टीका नारायण राणेंनी केली. राणे यांच्या टीकेला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नारायण राणेंवर पलटवार करताना गुलाबराव पाटील म्हणाले, एका पराभवामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची नाच्चकी झाली असेल तर नारायण राणे दोन वेळा पराभूत झाले होते. मग त्याचं काय झालं? याचा त्यांनी विचार करावा, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंना सणसणीत उत्तर दिलं आहे. राज्यसभेची एक जागा पराभूत झाल्याने राज्याच्या विकासात काही फरक पडणार आहे का? राणेंच्या बोलण्याचा अर्थ मला समजत नाही, त्यांनी त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला समजावून सांगावा, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असा टोलाही त्यांनी पाटील यांनी लगावला आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचा एकही आमदार फुटलेला नाही. पण काही अपक्ष आमदार फुटल्याची चर्चा आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले. शिवसेनेची मतं जर इकडे-तिकडे झाली असती, तर मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेल्युअर झाले असे म्हणता आलं असतं. निवडणुकीत विजय-पराजय सुरू असतो. राजस्थानमध्येही भाजपाची एकच जागा आली मग त्यांच्या प्रभारीने राजीनामा द्यावा, असं म्हणायचं का?, असा सवालही मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.
हेही वाचा