जळगाव : पुढारी वृत्तसेवा
महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ बांधलेले गांधी धाम हे देशातील पाचवे धाम आहे. बापूंचे जीवन आणि जीवनदृश्य येथे चित्रित केले आहे. लहान मुली-मुले आणि तरुण पिढी येथे येऊन प्रेरणा घेऊ शकतात. गांधीजींच्या सत्य, अहिंसा, स्वदेशी, सदाचार आदींचे शिक्षण घेऊन देश चालवणारे देशाला नवी दिशा देऊ शकतात. भवरलाल जैन यांची कल्पनाशक्ती वाखाणण्याजोगी आहे. बापूंच्या चरणी विनम्र अभिवादन, अशी लिखित प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नोंदविली.
राज्यपाल यांनी जैन हिल्सस्थित गांधीतीर्थला भेट दिली. गांधीतीर्थ येथे जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन, डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी त्यांचे स्वागत केले, यावेळी अतुल जैन उपस्थित होते. 'ऑडिओ गाइडचे म्युझियम खोज गांधीजी की' या संग्रहालयास राज्यपालांनी सुमारे तासभर भेट दिली. गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन, डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी राज्यपाल यांचे सुती हार देऊन स्वागत केले. गांधी रिसर्च फाउंडेशनचे मुख्य समन्वयक उदय महाजन, डॉ. अश्विन झाला, नितीन चोपडा उपस्थित होते.
गांधीतीर्थ साकारताना भवरलालजी जैन यांनी शेती, माती, पाणी आणि शेतकरी तसेच देशाचा, तरुणाईच्या भल्याचा विचार केला. तरुणांना गांधीजींचा आदर्श अनुभवता यावा यासाठी त्यांनी जैन हिल्स येथे गांधी रिसर्च फाउंडेशन, गांधीतीर्थची निर्मिती केली. या माध्यमातून युवाशक्ती, तरुणांबद्दल तसेच ग्रामविकास, शेतकर्यांचे जीवनमान उंचाविण्याबाबत ते सदैव प्रयत्नशील होते. त्या दृष्टीने गांधी रिसर्च फाउंडेशनचे निर्मिती उद्दिष्टाचे कार्य आजदेखील प्रभावीपणे होत आहे.