जळगाव; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेडून राबविण्यात आलेल्या अतिक्रमण मोहिमेतील जप्त टपऱ्या व फ्लेक्सचा सतरा मजली इमारतीच्या आवारात खच पडला आहे. वादळी वाऱ्यामुळे येथील पत्रे आणि फ्लेक्स उडून जात असल्याने लोकांना लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. जीवितहानी होण्याआधी महापालिकेने भंगार हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
महापालिकेतर्फे शहरातील अतिक्रमणांवर तसेच बेकायदेशीर फ्लेक्सवर कारवाई करण्यात येते. या कारवाईत अतिक्रमण विभागाकडून जप्त केलेल्या टपऱ्या, हातगाड्या, फ्लेक्स तसेच पत्रे आणून महापालिकेच्या सतरा मजली इमारतीच्या मागील बाजूस ठेवले जातात. सध्या वाऱ्याने टपऱ्यावरचे पत्रे व फ्लेक्स परिसरात उडून जात आहेत. गोलाणी संकुल परिसरात नागरिकांची नेहमी ये-जा सुरू असते. अद्याप कोणतीही जीवीतहानी झालेली नसली तरी अनेकवेळा नागरिक बचावले आहेत. नागरिकांकडून तक्रारी करूनही संबंधीत प्रशासन दुर्लक्ष करत आहे. पावसाळ्यात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने फ्लेक्स किंवा टपरीवरील पत्रे उडून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने येथील भंगार हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचलंत का ?