![जळगाव : बी.जे. मार्केट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तीव्र निषेध नोंदवत माेर्चा काढताना सर्वपक्षीय कार्यकर्ते. (छाया: चेतन चौधरी)](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F03%2F%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-3.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
शहरातील दीक्षितवाडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळा हटविण्याचा प्रयत्न झाला. समाजकंटकांविरोधात कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीयांनी मंगळवार (दि. २१) बी.जे. मार्केट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्वपक्षीयांतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला.
जळगाव शहरातील दीक्षित वाडी परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून स्थापन करण्यात आला आहे. दरम्यान जागेच्या वादावरून जागा मालकाने पोलीस बंदोबस्तात पुतळा हलविण्यात आला. ही बाब समाजबांधवांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत तीव्र विरोध करत ठिय्या आंदोलन केले. हातबल झालेल्या पोलीस प्रशासनाने अखेर वरिष्ठांच्या सूचनेनुसार हलवलेले पुतळे जागेवर पुन्हा स्थापन करण्यात आले.
तीन जणांवर गुन्हे दाखल...
दरम्यान पुतळा हलविणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी समाजबांधवांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून घेऊन त्या ठिकाणी देखील ठिय्या आंदोलन केले होते. त्यांच्या मागणीवरून साेमवारी, दि. 20 रात्री उशिरापर्यंत तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळे संरक्षण समितीतर्फे मंगळवार, दि. २१ मार्च रोजी दुपारी १२ वाजता बी.जे. मार्केट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.