![जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज घोटाळ्याची चौकशी सुरू; एकनाथ खडसे अडचणीत ? Eknath Khadse](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F08%2Feknath-khadase.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जळगाव: पुढारी वृत्तसेवा : मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज घोटाळा प्रकरणी राज्य शासनाचे ईटीएस पथक दाखल झाले असून चौकशीला प्रारंभ केला आहे. उत्खनन केलेल्या जागेचे मोजमाप करत आहे. हे पथक मुक्ताईनगरात दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तीन दिवस या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधी मंडळात एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांची दखल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली होती. तसेच या प्रकरणी महसूल विभागाकडून तपास केला जाईल, असे विखे पाटलांनी जाहीर केले होते. या सर्व घडामोडींनंतर आता अधिकारी मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले आहेत.
मुक्ताईनगर तालुक्यात ३३ हेक्टर ४१ आर जमिनीवरून उत्खनन करून ४०० कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता. मुक्ताईनगर तालुक्यात सातोड शिवारातील ३३ हेक्टर ४१ आर जमिनीतून करण्यात आलेल्या उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर जमिनीची खरेदी करण्यात आली. या जमिनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना म्हणजेच एनए प्रदान केल्याचा आरोप केला.
आमदार चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, जानेवारी २०१९ मध्ये आधीच एनए झालेल्या शेतीला पुन्हा कृषक करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला. आणि काही दिवसांमध्येच प्रांताधिकाऱ्यांनी याला तत्काळ शेतीसाठी परवानगी दिली. यामुळे महसूल खात्याच्या आशिर्वादाने शालेय प्रयोजनासाठी असलेल्या या शेतीला पुन्हा कृषक करण्यात आले. यानंतर याच ठिकाणावरून अवैध गौणखनिज उत्खनन करण्यात आले. खरं तर येथे १० हजार ब्रासच्या उत्खननाची परवानगी होती. मात्र, येथून लाखो ब्रास मुरूमासह अन्य गौणखनिजाचे उत्खनन करण्यात आले. या माध्यमातून येथून तब्बल ४०० कोटी रूपयांचा घोळ झाल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केला होता. या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली होती.
हेही वाचलंत का ?