![ग्रामपंचायत : जिल्ह्यात सदस्यांचे 56 तर सरपंचाचे 10 अर्ज बाद; आज अंतिम माघारी](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F12%2F%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत सोमवारी (दि. 5) अर्ज छाननीत सदस्य पदाचे 56, तर थेट सरपंचपदासाठीचे 10 अर्ज बाद ठरले. दरम्यान, बुधवार (दि.7)पर्यंत माघारीची अंतिम मुदत आहे.
सार्वत्रिक निवडणुकाअंतर्गत जिल्ह्यातील 14 तालुक्यांतील 196 ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी सुरू आहे. या ग्रामपंचायतींमधील 384 प्रभागांमधील सदस्यपदांसाठी इच्छुकांचे एकूण 5 हजार 212 अर्ज दाखल केले. तर थेट सरपंचपदाकरिता 979 इच्छुकांचे अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले. दाखल सर्व अर्जाची सोमवारी (दि. 6) छाननी प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये सरपंचाचे केवळ 10 अर्ज बाद ठरले. त्यामुळे रिंगणात 969 इच्छुकांचे अर्ज आहेत. तसेच सदस्यांमधून 5 हजार 212 पैकी 5156 नामनिर्देशन अर्ज वैध ठरले आहेत. तांत्रिक कारणास्तव प्रशासनाने 58 अर्ज अवैध ठरवले. निवडणुकीत अर्ज वैध ठरलेल्या इच्छुकांना माघारीसाठी बुधवारी (दि. 7) दुपारी साडेतीनपर्यंतची मुदत आहे. त्यानंतर लगेचच रिंगणातील अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्धी व निवडणूक चिन्ह वाटप केले जाईल. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छुकांसह स्थानिक स्तरावर पॅनल निर्मिती करून उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले आहेत. अंतिमत: माघारी कोण घेणार यावरच निवडणुकीचे चित्र अवलंबून असणार आहे. त्यामुळे माघारीकडे सार्यांचे लक्ष लागून आहे.