

धुळे : बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना धुळ्यात घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात प्रथमदर्शी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धुळे शहरातील राष्ट्रवादी भवनाजवळ असणाऱ्या विशाल इस्टेट या वसाहतीमध्ये पोलीस दलातील कर्मचारी सुनील पाथरवट हे परिवारासह राहतात. त्यांचा मोठा मुलगा प्रणव पाथरवट हा बारावीमध्ये होता. दोन दिवसांपूर्वीच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात त्याला कमी गुण मिळाल्याने तो काहीसा नाराज होता. मात्र या कारणामुळे त्यांनी राहत्या घरामध्ये छताला गळफास घेतला. ही बाब मनोज पाटील नामक व्यक्तीने पाथरवट यांना कळवली. त्यामुळे त्यांनी तातडीने घरी येऊन प्रणव याला एका खाजगी रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात नेले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
या घटनेमुळे विद्यार्थ्याने उचललेल्या अशा पावलामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान सुनील पाथरवट हे पोलीस कर्मचारी असून सध्या चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. या संदर्भात आता धुळे शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.