धुळे : वृक्ष लागवडीचे सुक्ष्म नियोजन करावे – जिल्हाधिकारी अभिनव गोयल

जिल्हाधिकारी अभिनव गोयल
जिल्हाधिकारी अभिनव गोयल
धुळे : पुढारी वृत्तसेवा
सन 2024 यावर्षांकरीता धुळे जिल्ह्यात पावसाळ्यात 50 लक्ष वृक्ष लागवडीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व विभागांनी वृक्ष लागवडीचे सुक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या.
वृक्ष लागवड कार्यकमातंर्गत नवीन नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीप्रसंगी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपवनसंरक्षक नितिनकुमार सिंग, उपजिल्हाधिकारी (रोहयो ) नितीनकुमार मुंडावरे, विभागीय वन अधिकारी गजानन सानप आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, धुळे जिल्ह्यात यावर्षी पावसाळयात ५० लक्ष वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा अदांज घेवून प्रत्येक विभागनिहाय वाटप करण्यात आलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ठ पूर्ण करावेत. वृक्ष लागवडीसाठी प्रत्येक विभागाने अक्षांश व रेखांश पद्धतीने जागेची निश्चिती करावी. वृक्षारोपणासाठी उंच, कमीत कमी दीड ते दोन वर्ष वयाची दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आणि पाण्याची उपलब्धता, हवामान, भौगोलिक परिस्थितीशी अनुरुप परंतु स्थानिक प्रजातीच्या रोपांची उपलब्धता करावी. यासाठी एकंदर ६० लक्ष रोपे तयार करण्यासाठी वन विभाग, सामाजिक वनीकरण विभागामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि इतर योजनांतर्गत निधीतून रोपवाटीका विकसित करण्याचे नियोजन करावे. त्याचबरोबर कृषी, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास विभाग, ग्रामपंचायत व अन्य विभागामार्फत मनरेगा व इतर उपलब्ध निधीतून रोपवाटिका सुरु करण्याबाबत आणि रोपांची उपलब्धता करण्याची कार्यवाही करावी.
वृक्षारोपण करतांना मियावाकी पद्धतीचा वापर करावा. मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवडीसाठी गाव तेथे मियावाकी,  ग्रामपंचायत, गायरान जमीन, पडीक जमीन, सरकारी शाळा, खाजगी शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, महापालिका, नगरपालिकेच्या मोकळ्या जागेचा वापर करावा. त्याचप्रमाणे वृक्ष लागवडीसाठी प्रत्येक गावात बिहार पॅर्टन, अकोला पॅटर्न, कन्या वन समृद्धी योजनाच्या माध्यमातून वृक्षारोपन करावे, बांबु लागवडीसाठी तसेच कृषी विभागाने मनरेगा अंतर्गत तसेच विविध योजनेतंर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी प्रोत्साहीत करावेत. तसेच वृक्षारोपणासाठी विभागांना देण्यात आलेले उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. उपजिल्हाधिकारी (रोहयो)  मुंडावरे यांनी यावेळी पीपीटीद्वारे माहिती दिली. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news