

Dhule To Pandharpur Banana Mahaprasad
धुळे : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातून अडीच टन केळीचा महाप्रसाद पंढरपूरकडे रवाना करण्यात आला. या महाप्रसादाच्या वाहनाचे व केळीच्या पूजनाचा विधी माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना करत, वरुणराजाने समाधानकारक पाऊस पाडावा, शेतकऱ्यांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी आणि सर्व जनतेला आनंद व समाधान लाभावे, अशी प्रार्थना केली.
आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो वारकरी व भाविक दाखल होत असतात. गेल्या महिनाभरापासून विविध संतांच्या पालख्या आणि दिंड्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे.
धुळे तालुक्यातील उडाणे येथील सामाजिक कार्यकर्ते धर्मराज बागुल हे गेल्या पाच वर्षांपासून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे वारकरी व भाविकांसाठी केळीचा महाप्रसाद घेऊन जात आहेत. उपवासाच्या दिवशी भाविकांना पौष्टिक प्रसाद मिळावा या उद्देशाने ते दरवर्षी केळीचे वाटप करतात. यंदाही त्यांच्या पुढाकारातून तब्बल अडीच टन केळीचा महाप्रसाद पंढरपूरकडे रवाना करण्यात आला.
महाप्रसाद रवाना करण्यापूर्वी धुळे येथे वाहनाचे व केळीच्या महाप्रसादाचे विधीवत पूजन करण्यात आले. या उपक्रमाचे कौतुक करताना माजी आमदार कुणाल पाटील यांनी शेतकऱ्यांना भरघोस पीक मिळावे, त्यांच्या कष्टाला योग्य फळ मिळून जीवन समृद्ध व्हावे आणि राज्यात सुख-शांती व समाधान नांदावे, अशी विठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना व्यक्त केली.
यावेळी ज्येष्ठ नेते विकास रंवदळे, चिंचवारचे माजी सरपंच सोमनाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते धर्मराज बागुल, शांताराम बागुल, माजी सरपंच संतोष पाटील, अशोक बागुल, नवल पदमर, शांताराम मोरे, किशोर शिंदे, सुभाष मासुळे, जगन्नाथ बागुल, सुधाकर शिंदे, रावसाहेब शिंदे, ज्ञानेश्वर मोरे, भगवान हालोर, भरत हालोर, जितू बागुल, राजेंद्र वाघ, सनी शिंदे, किरण वाघ, मनोहर मोरे आदी उपस्थित होते.