

नगर: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प देशातील युवा शक्तीला समर्पित आहे. तरुणांच्या हाताला काम व त्यांच्या स्वप्नांचा सन्मान करणारा हा अर्थसंकल्प असून, यातून शिक्षणापासून ते रोजगारापर्यंतच्या पायाभूत सुविधांना बळ मिळून विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करणारा आहे, असा विश्वास जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीबद्दल डॉ. विखे पाटील यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. संसदेत सादर झालेल्या या अर्थसंकल्पात रचनात्मक सुधारणा, उत्पादन क्षमतेत वाढ व लोकांची क्रयशक्ती वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
‘विकसित भारता’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसेच देशाला ज्ञान, तंत्रज्ञान व नवोपक्रमाद्वारे पुढे घेऊन जाण्यासाठी हा अर्थसंकल्प उपयुक्त ठरेल. देशातील युवकांच्या शिक्षणाबरोबरच रोजगार निर्मितीलाही यात प्राधान्य दिले आहे. उद्योगांना पाठबळ देतानाच यासाठी आवश्यक मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आहे. वस्त्रोद्योग, हातमाग व चर्मोद्योगाला नव्या संधी दिल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला स्थैर्य मिळेले, असा विश्वास डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला.
प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थिनींसाठी वसतिगृह उभारणे, साहित्य व क्रीडा क्षेत्र सक्षम करण्यासाठी दहा वर्षांकरिता ‘खेलो इंडिया मिशन’ तसेच कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण केंद्रे विकसित करण्याच्या घोषणांचेही पालकमंत्र्यांनी स्वागत केले. मधुमेह व कर्करोगावरील 17 औषधांवरील आयात शुल्क माफ करण्याचा निर्णय व अपघात विमा रक्कम करमुक्त केल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारताला ‘मेडिकल टुरिझम’चे मुख्य केंद्र बनविण्याचे प्रयत्न महत्त्वपूर्ण आहेत.
पशुवैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना अर्थसहाय्य, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवितानाच 500 एकात्मिक मत्स्य केंद्र उभारून यात महिलांना प्राधान्य, कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन, सिंचन क्षेत्रात गुंतवणूक, लखपती दीदीच्या उत्कर्षासाठी नव्या संधी व पर्यटन विकासामध्ये रोजगार निर्मितीला या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे, असे विखे पाटील यांनी म्हटले आहे.
तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षांच्या यशस्वी वाटचालीत जगात सर्वाधिक सात टक्क्यांचा विकास दर साध्य करताना जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब यात ठळकपणे दिसून येत असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
सर्वसामान्यांचा भ्रमनिरास करणारा अर्थसंकल्प: बाळासाहेब थोरात
मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा देशासमोरील आर्थिक व सामाजिक संकटांवर उपाय करण्याऐवजी प्रश्न अधिक गंभीर करणारा आहे. या अर्थसंकल्पात गरिबांसाठी कोणताही दिलासा नसून महागाई व बेरोजगारी आटोक्यात आणण्यासाठी ठोस उपाययोजना नाहीत. अर्थसंकल्प पूर्णपणे अपयशी असून भ्रमनिरास करणारा असल्याची टीका ज्येष्ठ नेते तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी केली.
थोरात म्हणाले की, देशामध्ये महागाई, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र हे नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या गेल्या नाही. अर्थसंकल्प पूर्णपणे अपयशी असून भ्रमनिरास करणारा आहे. ठप्प वेतनवाढ, कमकुवत मागणी आणि खासगी गुंतवणुकीतील मंदी ही अर्थव्यवस्थेसमोरील मोठी संकटे आहेत. असे असताना रोजगार वाढवण्यासाठी कोणताही विचार दिसत नाही. वाढत्या कर्जबोजाकडे आणि रुपयाच्या घसरणीकडेही सरकारने दुर्लक्ष केले आहे.
शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्यायासाठी निधी कमी केला असून गोरगरिबांसाठी या अर्थसंकल्पात कोणतीही विशेष तरतूद नाही. अर्थसंकल्प म्हणजे थकलेल्या व दिशाहीन सरकारचा दाखला असल्याची टीका करताना या अर्थसंकल्पातून मोठमोठे आकडे दाखवले गेले; मात्र जनहिताचा कोणताही विचार नसून पूर्णपणे दिशाहीन अर्थसंकल्प असल्याची टीका त्यांनी केली.
नाशिक-पुणे रेल्वेबाबत भ्रमनिरास: आ. तांबे
या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, नाशिक - पुणे रेल्वेबाबत संगमनेर तालुक्यासह उत्तर महाराष्ट्रातील जनतेला मोठी अपेक्षा होती; मात्र यामध्ये या हायस्पीड रेल्वेला पूर्णपणे दुर्लक्षित केले गेल्याने सर्व नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. उत्तर महाराष्ट्रासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना या अर्थसंकल्पात नसून रोजगारासाठी व शेतकऱ्यांसाठी कोणत्याही विशेष योजना राबवली नसल्याची टीका करताना, देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती ही फक्त आकडेवारीतून दाखविली जाते की काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नाशिक - पुणे रेल्वेमार्गासाठी कोणताही निधी व तरतूद नसल्याने अपेक्षाभंग झाल्याची टीका त्यांनी केली.