

नगर: जिल्ह्यातील मार्च 2026 अखेर मुदत संपणाऱ्या 758 ग्रामपंचायतींवर पुढच्या सोमवारपासून प्रशासकीय राजवट लागू करण्यात येणार आहे. विस्तार अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याबाबत जिल्हा परिषदेतून हालचालींना वेग आला आहे.
यापूर्वी डिसेंबर 2025 अखेर मुदत संपलेल्या 114 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबल्याने त्या ठिकाणी अगोदरच प्रशासक नियुक्ती करण्यात आली आहे. आता आणखी 758 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. त्या ठिकाणी दि. 9 फेब्रुवारीपासून प्रशासक कारभार हाकणार आहेत.
प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याबाबत आदेश आहेत. मात्र, ग्रामपंचायती आणि उपलब्ध अधिकारी संख्या यांच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. त्यामुळे शासनाकडे मार्गदर्शन मागाविण्यात येत आहे. सध्या ग्रामपंचायतीसोबतच कृषी, शिक्षण, पशुसंवर्धन विभागाचे विस्तार अधिकारी, तसेच अंगणवाडी पर्यवेक्षक, अशा संवर्गातील अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नियुक्त्या दिल्या जाण्यासाठी पंचायत समिती स्तरावर बीडीओंकडून नियोजन सुरू आहे.
ग्रामपंचायतींचे इच्छुकही वेटिंगवर
अहिल्यानगमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे गट आणि गणातील इच्छुक वेटिंगवर आहेत. अगोदर झेडपी व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मुदत संपणाऱ्या 114 आणि 758 अशा 872 ग्रामपंचायतीसाठी गेल्या सहा महिन्यांपासून तयारीत असलेल्या इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. लवकरच या निवडणुका व्हाव्यात, यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात बुडवल्याचे कानावर येत आहे.
प्रशासकांवरील जबाबदारी
जिल्ह्यातील 758 ग्रामपंचायतींवर शासनाच्या मार्गदर्शनानुसार आणि सीईओंच्या सूचनांनुसार प्रशासक नियुक्ती करण्याबाबत आदेशित केलेले आहे. निवडणुका होईपर्यंत ग्रामपंचायतींचा कारभार हा प्रशासक पाहतील. या कालावधीत गावची विकासाची कामे, विविध योजनांची अंमलबजावणी, तक्रार निवारण, याविषयी अन्य प्रशासकीय जबाबदारी ही संबंधितांवर असणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी दिली.