

कोपरगाव: येथील तहसील कार्यालयानजीक असलेले वर्षानुवर्ष जुने झालेले दुय्यम कारागृह मोडकळीस आले आहे. या कारागृहाची नूतनीकरण व्हावे, दोन मजली इमारत व्हावी म्हणून शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, सत्ता बदलामुळे हा प्रस्ताव पुन्हा एकदा लाल फितीत अडकला आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या प्रश्न दोन्ही आमदारांनी आवाज उठवणे गरजेचे आहे.
तहसील कार्यालयाची इमारत नव्याने उभारली. मात्र, त्या नजीक असलेले दुय्यम कारागृह आहे. त्या स्थितीत आजही उभे आहे. ते पूर्णतः मोडकळीस आले आहे. एकूण पाच बराकी आहेत. 20 कैदी क्षमता असलेल्या कारागृहात कैदी अक्षरशः कोंबण्यात येतात. त्यामुळे कैद्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
येथील कारागृह नव्याने व्हावे म्हणून तत्कालीन आ. स्नेहलता कोल्हे व आ. आशुतोष काळे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केल्याने त्याची दखल घेत शासनाने व जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने सहा कोटी 33 लाख 26 हजार रुपये किमतीचा तहसील कार्यालय आवारात सब जेल बांधकाम करण्यासाठी 30 मार्च 2022 ला प्रस्तावही सादर केला होता.
मात्र, सत्ता बदलाने हा प्रस्ताव पुन्हा रखडला गेला आहे. दोन मजली दुय्यम कारागृह येथे साकारले जाणार होते. त्यात तळमजला 488.71 चौरस मीटर, पहिला मजला 407.93 चौरस मीटर, असे आशयाचे प्रस्तावित बांधकाम करावयाचे होते.
त्याबाबतचे संबंधित नकाशे चतुसीमा, अंदाजपत्रक तयार केले होते. आरसीसी फ्रेम स्ट्रक्चर बांधकाम, बीम कॉलम फ्लोरिंग, टाइल्स रस्ते पार्किंग आदी सोयी सुविधा येथे आवश्यक होत्या. मात्र, हा प्रस्ताव लाल फिरत अडकल्याने पुन्हा बारगळला गेला आहे.
कोपरगाव तालुक्यात या दुय्यम कारागृहात लोणी, प्रवरानगर, राहाता, शिर्डी, कोपरगाव आदी ठिकाणचे कैदी ठेवण्यात येतात. त्यांना ने-आण करण्यासाठी पोलीस बळ लागते. वेळ खर्च होतो, जुनाट झालेले दुय्यम कारागृह वर्षानुवर्ष या कारागृहाचे काम रखडले गेले आहे.
हे दुय्यम कारागृह आरोपींनी दोन वेळा फोडण्याचा प्रयत्न करून पलायन केले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती डागडुजी केली. जाळ्या वगैरे बसवल्या, मात्र क्षमतेपेक्षा चार पट कैदी येथे ठेवले जात असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आहे.
सब जेलरचे पद निर्माण करावे
अहिल्यानगर जिल्ह्यात जेथे जेथे सब जेल आहे, तेथे स्वतंत्र दर्जाचे सब जेलर दर्जाचे पद आहे. मात्र, कोपरगाव येथील दुय्यम कारागृहात सब जेलरचे पद स्वतंत्र नाही. त्यामुळे ते पद निर्माण करावे, म्हणजे त्याचा पदभार स्वतंत्र राहील, अशी मागणी होत आहे. आता नवनिर्वाचित आ. विवेक कोल्हे यांनीही त्यात लक्ष घालणे गरजेचे आहे. त्यासाठी अधिवेशनात तारांकित प्रश्न करणे आवश्यक ठरणार आहे.