

श्रीरामपूर: एकेकाळी आदर्श शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीरामपूर शहराची ओळख आता गुन्हेगारी शहर म्हणून होत चालली आहे. कारण वेळोवेळी पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसती. मात्र, आपण याबाबत राज्याचे पोलिस महासंचालक आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून पुढील काळात गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याबाबत सूचना दिल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
शहरातील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांचा शनिवारी खून झाल्यानंतर काल रविवारी (दि. १२) सकाळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. त्यावेळी या घटनेबाबत पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, घडलेली घटना निंदनीय आणि निषेधार्ह आहे. श्रीरामपूरात अनेक अवैध धंदे सुरू आहेत. अनेक गुंडांच्या टोळ्या कार्यरत आहेत. अनेक गोरगरीब जनतेवर अन्याय झाला आहे. अनेक महिलांवर अत्याचार झाले असल्याच्या घटना घडत आहेत, अशीही माहिती मिळाली आहे.
याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी आपली चर्चा झाली असून एका महिन्यात श्रीरामपूरातील सर्व प्रकारच्या गुन्हेगारीचा बीमोड करण्याचे आश्वासन दिले असून या प्रकरणात स्वतः पोलिस अधिक्षकांनी लक्ष घातल्याचे सांगितले. गुन्हेगारांना कोणी पाठीशी घालत असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आश्वासन पोलिस अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या ऑनलाइन नशेची इंजेक्शन आणि पदार्थ मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घातले असून त्याचाही बंदोबस्त करण्याची कार्यवाही शासन दरबारी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वाळू प्रकरणावरून गुन्हेगारी टोळ्या
वाळूमुळे अनेक गुन्हेगार तयार होत होते. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होत होता. म्हणून आपण महसूलमंत्री असताना वाळू धोरणात बदल केला होता. आता परत वाळू प्रकरणावरून गुन्हेगारी टोळ्या तयार होत आहेत. शासनदरबारी हा विषय प्राधान्याने मांडून या गुन्ह्यांवर अंकुश आणण्याचा प्रयत्न करू, असेही मंत्री विखे यांनी सांगितले.