

श्रीरामपूर: श्रीरामपूर नगरपालिकेच्या इतिहासात कधीही न झालेली पाणी कपात आजपासून लागू होत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेच्या साठवण तलावाचे काम सध्या सुरू असल्यामुळे शहराला आता एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतलेला आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आजपर्यंतच्या इतिहासात कधीही अशी वेळ आलेली नव्हती. एखादा दिवस अपवाद म्हणून रोटेशन लावले असेल परंतु दिवसाआड पाणीपुरवठा कधीच झाला नव्हता. आता मात्र तो होणार असल्याने नागरिकांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
माजी आमदार के. जयंत ससाणे यांनी शहराच्या पाणीपुरवठ्याची काळजी घेऊन शहरात नवीन साठवण तलाव केले. तसेच 40 दिवस पुरेल इतका पाणीसाठा असणारे तलाव तयार केले. आता शहराला नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून त्यामध्ये 90 दिवस पुरेल इतका पाणीसाठा होणार आहे. परंतु सध्या योजनेचे काम चालू असल्याने जुन्या कमी क्षमतेच्या साठवण तलावाद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नुकतेच रोटेशन बंद झाले असून उपलब्ध पाणी जास्तीत जास्त दिवस पुरावे यासाठी पालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतलेला आहे. पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी केली तर 18 दिवसानंतर सुद्धा पिण्यासाठी पाटबंधारे विभाग पाणी सोडू शकतो. त्यामुळे दिवसाआड पाण्याचे संकट कमी होऊ शकते. दरम्यान, एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याने नूतन नगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासमोर हा पहिलाच प्रश्न निर्माण झाला आहे.
पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज
जलसंपदा विभागाकडील पुढील आवर्तन कधी सुटेल हे निश्चित नसल्यामुळे नगर परिषदेच्या साठवण तलावात असणारे पाणी पुढील आवर्तनापर्यंत पुरविणे नगर परिषदेला कमप्राप्त आहे, म्हणून दि.23 डिसेंबर 2025 पासून शहरातील नागरिकांना एक दिवसआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे. त्यानुसार दि.23, 25,27,29, 31 डिसेंबर रोजी वेळेत पाणी पुरवठा केला जाईल. नागरिकानी उपलब्ध असलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर करून नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी मच्छिद्र घोलप व प्रशासक किरण सावंत पाटील यानी केले.
पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत ‘नो कॉम्प्रमाईज’
पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड चालणार नाही. यामागे काय होते, काय झाले, यात पडायचे नाही. श्रीरामपुरात पिण्याचे पाणी स्वच्छ व मुबलक प्रमाणात नागरिकांना द्या, अशा सूचना नवनिर्वाचित लोकनियुक्त अध्यक्ष करण ससाणे यांनी नगरपरिषद अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, आ.हेमंत ओगले यांच्या मार्फत आपण पिण्याच्या पाण्यासाठी अतिरिक्त आवर्तनाची मागणी करणार असल्याचे देखील ससाणे यांनी सांगितले. नगरपरिषदेने जाहीर केले की एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार, त्या संदर्भात तातडीने नगराध्यक्ष ससाणे यांनी नगरसेवकांसह साठवण तलाव गाठत पाहणी केली आणि पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, बाबासाहेब दिघे, ज्येष्ठ नगरसेवक मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, राजेंद्र पवार, योगेश जाधव, रईस जहागिरदार, कलीम कुरेशी, लकी सेठी, सुभाष पोटे, दिपक वमने, बिट्टू कक्कड, नीलेश नागले, संतोष परदेशी, रितेश एडके, अफरोज शहा, प्रवीण कोठावळे, अभिजित लिप्टे, सिद्धार्थ सोनवणे, सागर कुऱ्हाडे, भाग्येश लोखंडे, अतुल शेटे, नगर अभियंता अभिजित मराठे, नीलेश बकाल उपस्थित होते.
नगराध्यक्ष ससाणे म्हणाले की, श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे विशेष लक्ष देणारा असून त्यामध्ये पाणी, आरोग्य, लाईट आणि बांधकाम या विभागांमध्ये तातडीने बदल करणे आवश्यक आहे. त्याबाबत आपण लवकरच निर्णय घेऊ असे देखील ससाणे यांनी म्हटले आहे. नगराध्यक्ष ससाणे, हे लवकरच नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारणार असून त्या अगोदर त्यांनी साठवण तलावाची पाहणी करून पिण्याच्या पाण्याचा आढावा घेतला आहे.
पहिले पत्र आवर्तन मागणीचे!
नगराध्यक्ष ससाणे यांनी पहिले पत्र पिण्याच्या पाण्याचे आवर्तन तातडीने सोडण्याबाबत मागणी केली. श्रीरामपूर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे, माजी नगराध्यक्ष राजश्रीताई ससाणे यांच्या कार्यशैली प्रमाणेच करण ससाणे यांचे कामकाज राहिल, यात तिळमात्र शंका नसल्याचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर म्हणाले.