

कोपरगाव: येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने पाच वर्षांपासून सुरू केलेल्या ‘एक राखी जवानांसाठी’ अभियानातून रक्षा रथाचे साईनगरी शिर्डी येथून गुजरात-कच्छच्या दिशेने प्रस्थान झाले. श्री साईबाबांच्या पावन भूमीतून रवाना झालेला हा रक्षा रथ माता-भगिनींनी जवानांसाठी प्रेमाने पाठविलेल्या राख्या, विद्यार्थ्यांची देशभक्ती आणि जवानांप्रती कृतज्ञतेची भावना घेऊन सीमेच्या दिशेने निघाला. या उपक्रमाला शिर्डीकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
माता-भगिनी, विद्यार्थी, साईभक्त, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत जवानांसाठी राख्या जमा केल्या. त्यामुळे शिर्डीतील प्रस्थान सोहळ्यात भक्ती आणि शक्तीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
यावेळी काशीकानंदगिरी महाराजांच्या आश्रमातील विद्यार्थी व शिक्षकांनी पावली आणि भजन सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन सादर केले. आत्मा मालिक शैक्षणिक संस्थानच्या वतीने प्रमुख पाहुण्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. साईनाथ माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जवानांसाठी राख्या पाठवल्या.
यावेळी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आ. विवेक कोल्हे म्हणाले, “देशाच्या सीमेवर कठीण परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या जवानांना आपण विसरलेलो नाही, संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे, हा विश्वास देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तमराव मते, माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजपा माजी शहराध्यक्ष सचिन शिंदे, भाजपा युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष चेतन कोते, युवा मोर्चाचे माजी जिल्हा सरचिटणीस नरेश सुराणा, गणेश जाधव, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चौगुले, राहाताचे नगरसेवक धनंजय गाडेकर, शिवसेनेचे अमोल गायके, रवींद्र सोनवणे, गणेश कारखान्याचे संचालक बाबासाहेब डांगे, साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, नारायणराव कार्ले, भगवानराव टिळेकर, संपत हिंगे, अनिल गाढवे, बाळासाहेब चोळके आदी उपस्थित होते.