

नगर: साखरेचे दर कडाडल्याने दसरा-दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची भीती लक्षात घेऊन, जिल्हा पुरवठा विभागाकडून घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांच्या गोडाऊनची तपासणी सुरू आहे. चार हजार क्विंटलपेक्षा अधिक साठा आढळून येणार्या व्यापार्यावर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साखर ४९ रुपये किलो होती. त्यानंतर ५२ रुपये झाली. गेल्या काही दिवसांत हा दर ८० रुपयांवर पोहोचला आहे. वाढत्या दरामुळे श्रावण महिन्यातील सण तसेच आगामी दसरा-दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर साखरेची कृत्रिम टंचाई आणि साठेबाजी रोखण्यासाठी पुरवठा विभागाने जिल्हाभरातील साखरेच्या घाऊक तसेच किरकोळ दुकानांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
अहिल्यानगर शहरातील काही व्यापार्यांच्या गोडाऊनची तपासणी केली. परंतु चार हजार क्विंटलपेक्षा अधिक साठा आढळून आलेला नाही. पाथर्डी तालुक्यातदेखील तपासणी झाल्याचा अहवाल विभागाला प्राप्त झाला. तेथेही काही आढळून आले नसल्याचे विभागाने म्हटले आहे. साखरेचे दर वाढल्याने बाजारपेठेत साखरेची उपलब्धता आणि साठ्याबाबत जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने विशेष लक्ष दिले जात आहे. व्यापार्यांना केंद्रीय अन्नधान्य पोर्टलवर नोंदणी करणे आणि दर शुक्रवारी साठ्याबाबत माहिती पोर्टलवर टाकण्याचे बंधनकारक करण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी सांगितले.