

संगमनेर: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या विकासासाठी 25 कोटी व वेल्हाळे ते राजापूर म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी 6 कोटी असे एकूण 31 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील रस्त्याच्या तसेच फुलांच्या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा, या करीता सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच अर्थसंकल्प जाहीर केला. यात तालुक्यातील ग्रामीण भागातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे तालुक्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या निधीतून कोकणगाव ते मांची घाट, सुकेवाडी ते राष्ट्रीय महामार्ग 50, चिंचेवाडी-साकूर, ते राष्ट्रीय महामार्ग 71 ते मारुती मंदिर, अकोले नाका शारदा शाळा ते तीन बत्ती चौक, निमगाव बुद्रुक गाव, राजापूर तसेच जोर्वे नाका ते निंबाळे चौफुली नान्नज दुमाला ते पारेगाव बुद्रुक, निमगाव टेंभी ते शिरापूर, जोर्वे ते वडगाव पान, कवठे कमळेश्वर ते लोहारे, झोळे ते नांदुरी दुमाला, वाघापूर ते जिल्हा महामार्ग डिग्रस-अंभोरे, चिकणी ते डोंगरगाव, हिवरगाव पठार ते जिल्हा महामार्ग, तसेच कोकणगाव ते डोंगरे वस्ती व नवले वस्ती ते जिल्हा महामार्ग या रस्त्यांच्या विकासाची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
अर्थसंकल्पात संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील रस्त्यांची कामे होतील, वाहतुकीला गती मिळेल. ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून आगामी काळातही तालुक्यातील विविध विकासकामांसाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील.
आमदार अमोल खताळ