

संगमनेर: लोकनाट्य-तमाशा क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल संगमनेरचे ज्येष्ठ कलावंत आणि भारतीय तमाशा फड मालक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांना जाहीर झालेला ‘पद्मश्री’ किताब म्हणजे तमाशा क्षेत्रासोबतच संगमनेरच्या इतिहासाला सुवर्णपान जोडल्याची भावना व्यक्त होत आहे. खेडकर यांच्या रूपाने तमाशा क्षेत्रात पहिल्यांदाच पद्म पुरस्कार दिला जात असल्याने हा सन्मान म्हणजे अवघ्या तमाशा सृष्टीचा सन्मान आहे, अशा भावना तमाशा कलावंतांमधून व्यक्त होत आहेत.
आपले संपूर्ण आयुष्य तमाशा कलेला समर्पित करणाऱ्या (स्व.) कांताबाई सातारकर आणि तुकाराम खेडकर यांचे पुत्र रघुवीर खेडकर यांनी आई-वडिलांचा वसा चालवत संपूर्ण आयुष्य तमाशा कलेची सेवा केली. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा सन्मान मिळवलेल्या खेडकर यांना राज्यातील अनेक संस्थांनी विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. पुणे विद्यापीठाने त्यांच्या इतिहासात प्रथमच रघुवीर खेडकर यांचा सन्मान केला. 2010 मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या काळात दिल्लीच्या रवींद्र भवन येथे तमाशा सादर करण्याचा मान रघुवीर खेडकर यांना मिळाला होता. संगीत नाटक अकादमीने चंडीगड येथे त्यांच्या तमाशाचे आयोजन केले होते. अकलूज येथे झालेल्या ढोलकी फड तमाशा स्पर्धेतही खेडकर तमाशा फडाने प्रथम क्रमांक मिळवला होता.
संगमनेर ही लोककलावंतांची भूमी असून कवी अनंत फंदी, प्रथम महिला तमाशा कलावंत पवळा भालेराव-हिवरगावकर, लोकशाहीर विठ्ठल उमप, लावणी कलावंत गुलाबबाई संगमनेरकर, तसेच ज्येष्ठ तमाशा कलावंत (स्व.) कांताबाई सातारकर हे कलावंत संगमनेरचे भूषण मानले जातात. या सर्व लोककलावंतांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने दर वर्षी लोककला पुरस्कार देण्यात येतात. मागील वर्षी स्व. कांताबाई यांच्या नावाने सातारा जिल्ह्यातील तमाशा कलावंत कोंडीराम आवळे मास्तर यांना लोककला पुरस्कार देण्यात आला होता.
ग्रामीण कलेचा गौरव: राधाकृष्ण विखे
दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीले यांनी खेडकर यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले. हा पद्म पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण कलेचा गौरव असून, त्यामुळे तमाशा कलेचा नावलौकिक झाला असल्याची प्रतिकिया त्यांनी व्यक्त केली. खेडकर परिवाराचे मोठे योगदान तमाशा कलेसाठी आहे. आव्हानात्मक परीस्थितीत तमाशा कला जिवंत ठेवण्यासाठी समर्पित भावनेने दिलेल्या योगदानाचा गौरव केंद्र सरकारने केल्याचा अभिमान आहे. तमाशा ग्रामीण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकारांनी आपल्या त्यागाने महाराष्ट्राच्या कला परंपरेची जोपासना करण्याऱ्या प्रत्येक कलावंताचा बहुमान या पुरस्काराने झाला आहे, असेही ते म्हणाले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा पहिला राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार प्रवरा परिवाराने स्व.कांताबाई सातारकर यांना दिल्याची आठवणही विखे पाटील यांनी सांगितली.
(स्व) कांताबाई सातारकर यांचा समृद्ध वारसा घेऊन लोककलावंत रघुवीर खेडकर यांनी आयुष्यभर समर्पित भावनेने तमाशाच्या माध्यमातून सेवा केली. त्यांना मिळालेल्या पुरस्कार हा संगमनेर तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यासाठी गौरवास्पद आहे.
बाळासाहेब थोरात, माजी मंत्री
तमाशाचा फड सांभाळताना राज्यभरातील विविध कलाकारांची जबाबदारी रघुभाऊ अत्यंत समर्थपणे सांभाळतात. कलेच्या माध्यमातून जनसेवा हे त्यांचे व्रत असून त्यांचा सन्मान हा संगमनेरकरांसाठी अभिमानास्पद आहे.
आमदार सत्यजित तांबे
रघुवीर खेडकर व त्यांच्या मातोश्री (स्व.) कांताबाई सातारकर यांनी तमाशाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले आहे. त्यांना पद्म पुरस्काराबद्दल लवकरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने त्यांचा भव्य सन्मान करणार आहोत.
आमदार अमोल खताळ
माझे वडील तुकाराम खेडकर, आई कांताबाई सातारकर यांनी मला जे कलेचे संस्कार दिले त्याचा आणि आमच्या एकूण तमाशा कलेचा हा सन्मान आहे. या आनंदाच्या प्रसंगी एकच खंत आहे, हा सन्मान सोहळा बघण्यासाठी आई हवी होती.
रघुवीर खेडकर